केदारनाथमध्ये ढगफुटीमुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे.  (Image source- NDRF)
राष्ट्रीय

Uttarakhand rains | उत्तराखंडमध्ये अस्मानी संकट! १६ मृत्यू, केदारनाथशी संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

उत्तराखंडच्या (Uttarakhand rains) काही भागांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेक मार्गावरील भीमभालीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ खोऱ्याशी संपर्क तुटला आहे. येथे सुमारे ४५० लोक अडकून पडले आहेत, तर केदारनाथ महामार्ग सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान वाहून गेला आहे.

यामुळे चार धाम यात्रा ठप्प झाली आहे. केदारनाथ मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा (Kedarnath yatra) थांबवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भिंबलीजवळील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. एनडीआरएफने सोनप्रयाग आणि भिंबली दरम्यानच्या मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यास कालपासून सुरुवात केली होती.

केदारनाथ येथे हवाई दलाकडून बचावकार्य

शुक्रवारी सकाळपासून भारतीय हवाई दल (Indian Air Force) केदारनाथ येथे सुरू असलेल्या बचावकार्यात सहभागी झाले. भारतीय हवाई दलाने उत्तराखंडच्या केदार खोऱ्यात बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी एक चिनूक आणि एमआय - १७ व्ही ५ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. ते राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बचावकार्य करतील, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुद्रप्रयाग- दोन पूल वाहून गेले

रुद्रप्रयागचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी एन के राजवर म्हणाले, “गौरीकुंडपासून सुरू होणारा १६ किमीचा केदारनाथ ट्रेक मार्ग घोडा पडाव, लिंचोली, बडी लिंचोली आणि भिंबली येथे खराब झाला आहे. रामबाडाजवळील दोन पूलही काल रात्री वाहून गेले आहेत.''

केदारनाथ यात्रा मार्गावरील ४२५ लोकांना केले एअरलिफ्ट

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (SDRF) भिंबळीच्या पलीकडे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी उंच डोंगरातून १ किमीचा पर्यायी मार्ग तयार केला आहे. एसडीआरएफचे कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी सांगितले की, केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भिंबली, रामबाडा, लिंचोली येथे अडकलेल्या सुमारे ४२५ लोकांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. सोनप्रयाग आणि भिंबली दरम्यान अडकलेल्या सुमारे १,१०० लोकांना पर्यायी मार्गाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT