Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: "माझी मोठी चूक झाली!" बहिणीला मेसेज पाठवला आणि सरकारी लिपिकाने पत्नी, आईसह २ मुलांवर झाडल्या अंदाधुंद गोळ्या

एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील चार सदस्यांची निर्घृण हत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.

मोहन कारंडे

Crime News

मेरठ: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील चार सदस्यांची निर्घृण हत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे," असा शेवटचा संदेश बहिण आणि नातेवाईकांना पाठवून या कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

सिंचन विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले अशोक राठी (४२) हे आपल्या कुटुंबासह सहारनपूरमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एकाच खोलीत पाच जणांचे रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून पोलीसही हादरले.

मृतांमध्ये सिंचन विभागातील लिपिक अशोक राठी (४२), त्याची पत्नी अजंता (४०), आई विद्यावती (७२) आणि कार्तिक (१५) व देव (१४) या दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या खोल्यांमधून तीन देशी बनावटीची पिस्तूलं जप्त केली आहेत. प्रत्येक मृताच्या डोक्यात आणि छातीत अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या गेल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

व्हॉईस नोट आणि एटीएम पासवर्ड

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, अशोक यांनी घटनेच्या काही वेळ आधी आपल्या नातेवाईकाला सोशल मीडियावर एक संदेश पाठवला होता, ज्यामध्ये लिहिले होते, "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे." पोलिसांनी या वाक्याला तपासाचा मुख्य धागा मानले आहे.

सहारनपूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सागर जैन यांनी सांगितले की, "अशोक यांनी त्यांच्या मोहिनी नावाच्या बहिणीला एक व्हॉईस नोटही पाठवली होती. त्यामध्ये त्यांनी 'मी भयंकर चूक केली असून मी माझे जीवन संपवत आहे' असे म्हटले होते. विशेष म्हणजे त्यांनी बहिणीला त्यांच्या एटीएम कार्डचे पासवर्डही शेअर केले होते."

नैराश्यातून टोकाचे पाऊल?

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर अशोक नैराशेत होता. कोरोना काळात आजारी पडल्यानंतर त्याची प्रकृती अधिक खालावली होती. त्याच्यावर चंदीगडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. धक्कादायक म्हणजे, गेल्या वर्षीही त्याने आपल्या कुटुंबाला झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.

नातेवाईकांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला असून, मृतदेहांवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली आहे. शेजाऱ्यांच्या मते हे कुटुंब कोणामध्ये जास्त मिसळत नसे. त्यांच्यात काही वाद असल्याचे किंवा ते तणावाखाली असल्याचे कधीही जाणवले नाही. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. हत्येचा नेमका क्रम लावण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT