प्रथमेश तेलंग : नवी दिल्ली
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार यावर त्यांच्या दिल्ली दौऱ्यात शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. गुरुवारी (दि.8) काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाली. त्याअगोदर बुधवारी (दि.7) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर चर्चा झाल्याचे समजते. तर उद्धव ठाकरे यांना राजकीय राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन आपले दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवायचे आहेत. मात्र, त्यांनी अद्याप विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली नाही. महाविकास आघाडीवर दबाव आणण्यासाठी दरवाजे उघडे ठेवणे गरजेचे असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात लढवणे फायदेशीर ठरेल, असे काँग्रेसला वाटते. याचा फायदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीतही झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान याबाबत चर्चा झाली. यामध्ये आघाडीतील सर्व पक्षांनी एका सुरात काम करायचे ठरले. काँग्रेसने उद्धव ठाकरेंना नेतृत्व देण्यास सहमती दर्शवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही उपस्थित होते. जवळपास ५० मिनिटे ही बैठक झाली. याअगोदर उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालय बार असोशिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांचीही भेट घेतली. या भेटीत शिवसेना पक्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांवर चर्चा झाली.
दोन्ही शिवसेना एकत्र करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेने एकत्र यावे आणि एनडीएचा भाग व्हावे, अशी भाजपची इच्छा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय बलिदान देण्यास भाजप तयार आहे. सध्या तरी उद्धव ठाकरेंकडून संमती मिळालेली नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपले दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत.