Uber layoffs
नवी दिल्ली : उबरने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने सुमारे ३,३०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधाही जवळपास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ सुमारे १ टक्के कर्मचाऱ्यांनाच कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी असेल.
कंपनीने बुधवारी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये ही माहिती दिली. सध्या उबरमध्ये सुमारे ३० हजार कर्मचारी आहेत. कर्मचारी कपातीनंतरही कंपनीतील बहुतांश कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन काम करावे लागणार आहे.
उबरच्या नव्या धोरणानुसार, जगभरातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी जास्तीत जास्त १ टक्के कर्मचाऱ्यांनाच पूर्णपणे घरून काम करण्याची परवानगी असेल. ही संख्या उद्दिष्ट नसून कंपनीने निश्चित केलेली कमाल मर्यादा आहे. कोरोना महामारीनंतर गेल्या पाच वर्षांत विविध ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र, आता कंपनीने हे धोरण बदलले आहे. उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोस्रोशाही यांच्या मते, प्रत्यक्ष कार्यालयात एकत्र काम करून समस्या सोडवणे हे दूरस्थ कामापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे कंपनीला महामारीनंतरच्या काळात जाणवले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना, जे सध्या घरून काम करत आहेत, त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले जात आहे. म्हणजेच, नोकरी टिकली तरी ती ज्या शहरात आहे, त्याच शहरात राहण्याची अट कर्मचाऱ्यांसमोर आहे.
उबरने विविध विभागांसाठी कार्यालयांची ठिकाणे निश्चित केली आहेत. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या टीम्सना न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को येथे काम करावे लागेल. प्रादेशिक टीम्सना संबंधित प्रादेशिक केंद्रांमध्ये, तर स्थानिक टीम्सना देशातील निश्चित केंद्रांमध्ये काम करावे लागणार आहे. इंजिनीअरिंग टीम्ससाठी स्वतंत्र टेक हब निश्चित करण्यात आले आहेत. व्यवस्थापकांना शक्य तितक्या त्यांच्या टीमसोबतच ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. तसेच, करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांनी एकट्याने दूरस्थपणे काम करू नये, यावरही कंपनीने भर दिला आहे.
नोकरकपातीमुळे कोणत्या कार्यालयांना सर्वाधिक फटका बसला आहे, हे उबरने सांगितलेले नाही. त्यामुळे, लहान कार्यालयांमधील लोकांना एकाच वेळी दोन प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे: त्यांची नोकरी टिकेल का आणि ते राहत असलेल्या शहरात ती टिकेल का.
उबरमध्ये यापूर्वीपासूनच आठवड्यात तीन दिवस कार्यालयातून काम करण्याचे हायब्रिड धोरण आहे. हे धोरण कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, आता त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. अनेक कंपन्यांमध्ये हायब्रिड धोरण कागदावर असते, परंतु प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली जात नाही. उबर मात्र आता कर्मचारी आठवड्यातील तीन दिवस कार्यालयात येतात की नाही, याची नियमित नोंद ठेवणार आहे. त्यामुळे केवळ ‘ऑफिसला या’ असे सांगण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना कंपनीने निश्चित केलेल्या विशिष्ट कार्यालयातच हजेरी लावणे बंधनकारक होणार आहे.
उबरमधील कर्मचारी कपातीमागे कंपनीची संघटनात्मक पुनर्रचना आणि वाढती स्पर्धा ही प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीने सीईओच्या सात किंवा त्याहून अधिक स्तरांखालील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी कमी केली आहे. तसेच, केवळ एक किंवा दोन वरिष्ठांना रिपोर्ट करणाऱ्या टीम्सची संख्याही निम्म्यावर आणण्यात आली आहे.
रेस्टॉरंट, रिटेल आणि थेट कॉमर्सशी संबंधित तीन डिलिव्हरी ऑपरेशन्स टीम्सचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. इंजिनीअरिंग विभागातील कोअर सर्व्हिसेस इंजिनिअरिंग आणि सायन्स यांचे एकत्रीकरण केले जात आहे. गेल्या पाच वर्षांत उबरचा महसूल जवळपास तिप्पट झाला असला तरी कंपनीत व्यवस्थापनाचे अतिरिक्त स्तर, समन्वयातील गुंतागुंत आणि जबाबदारीबाबत अस्पष्टता निर्माण झाली होती, असे खोसरोशाही यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, या कर्मचारी कपातीचे कारण म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याऐवजी स्वयंचलित वाहनांच्या क्षेत्रातील वाढती स्पर्धा कंपनीसमोरील मोठे आव्हान आहे. Waymoची रोबोटॅक्सी सेवा ऑस्टिन आणि अटलांटा येथे उबरच्या अॅपद्वारे उपलब्ध आहे. दुसरीकडे टेस्ला चालकविरहित प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. या स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवण्यासाठी उबरने १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च करण्याची योजना आखत आहे. या निर्णयामुळे कंपनीला दरवर्षी २ अब्ज डॉलरपर्यंत बचत होऊ शकते, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
उबरने कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले आहे. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांना घरून कामाची सुविधा बंद करून दुसऱ्या शहरातील कार्यालयात स्थलांतर करावे लागणार आहे, त्यांना याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.