Twisha Sharma case
भोपाळ : नोएडाहून भोपाळमध्ये लग्नानंतर आलेल्या ३१ वर्षीय मॉडेल ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला सातत्याने नवे वळण मिळत आहे. या प्रकरणातील सत्याचा छडा लावण्यासाठी, आज भोपाळ एम्स (AIIMS) मध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत मृतदेहाचे पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूच्या कारणांबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधता यावीत, यासाठी हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही प्रक्रिया पार पडली. दिल्ली एम्समधून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले. मृतकेचा भाऊ मेजर हर्षित शर्मा यांनी माहिती दिली की, आज संध्याकाळी ५ वाजता भदभदा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. दिल्ली एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे चार सदस्यीय पथक शनिवारी उशिरा रात्री भोपाळला पोहोचले होते.
या प्रकरणाने आता राष्ट्रीय पातळीवरही लक्ष वेधून घेतले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची स्वतःहून दखल (सुओ मोटो) घेत विशेष सुनावणी निश्चित केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांचे विशेष खंडपीठ सोमवार, २५ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची नोंद "एका तरुण महिलेचा तिच्या सासरच्या घरी झालेल्या अनैसर्गिक मृत्यूशी संबंधित कथित संस्थात्मक पूर्वग्रह आणि प्रक्रियात्मक अनियमितता" अशी केली आहे. न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे सुरुवातीच्या पोलीस आणि प्रशासकीय कारवाईवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
ट्विशाचे समर्थ सिंग यांच्याबरोबर डिसेंबर महिन्यात विवाह झाला होता. ती १२ मे रोजी भोपाळच्या कटारा हिल्स येथील सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केल्याचे आरोप केले, ज्याच्या आधारे पती समर्थ सिंग आणि सासू गिरिबाला सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे १० दिवस फरार राहिल्यानंतर समर्थ सिंग शुक्रवारी जबलपूर न्यायालयात आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचला होता, तिथून पोलीस त्याला ताब्यात घेऊन भोपाळला आले. स्थानिक न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, सासू गिरिबाला सिंग यांना वारंवार नोटीस देऊनही त्या अद्याप चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झालेल्या नाहीत.
दरम्यान, मृतकेचा भाऊ मेजर हर्षित शर्मा यांनी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी लवकरात लवकर सीबीआय (CBI) तपास सुरू करण्याची आपली मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. सध्या सर्वांचे लक्ष दुसऱ्या शवविच्छेदन अहवालावर आणि सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर केंद्रित झाले आहे.