Trinamool Congress split : तृणमूल काँग्रेस (TMC) मधील बंडखोर गटाने पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्याविरोधात उघड बंड पुकारले आहे. विरोधी पक्षनेते आणि उलुबेरिया पुरबाचे आमदार रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील या बंडखोर गटाने सोमवारी ज्येष्ठ आमदार अरुप रॉय यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली. हाच 'खरा' तृणमूल काँग्रेस असल्याचा दावाही या गटाने केला आहे.
कोलकाता येथील न्यू टाऊनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित विशेष अधिवेशनात अरुप रॉय यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला बंडखोर आमदार, नगरसेवक आणि विविध जिल्ह्यांतील माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पक्षांतर्गत निर्माण झालेल्या 'घटनात्मक संकटावर' तोडगा काढण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचे बंडखोरांनी स्पष्ट केले आहे.
या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने रितब्रत बॅनर्जी यांच्या हवाल्याने सांगितले की, "पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्याचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक बनले होते."
हावडा सेंट्रलचे आमदार असलेल्या अरुप रॉय यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.या बंडखोर गटाने आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये अरुप रॉय, रितब्रत बॅनर्जी यांच्यासह कोलकाताचे माजी महापौर आणि एकेकाळी ममता बॅनर्जींचे खंदे समर्थक राहिलेले फिरहाद हकीम, अरुप बिस्वास, बिप्लव मित्रा, अखरुझमान अन्सारी, सबिना यास्मिन, संदिपन साहा, रथिन घोष आणि जावेद खान यांचा समावेश आहे.
ममता बॅनर्जी यांनी जानेवारी १९९८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. पक्षाच्या स्थापनेपासून त्या त्याचे नेतृत्व करत आहेत. गेल्या एप्रिल महिन्यातील विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा पराभव होऊन सत्ता जाण्यापूर्वी त्यांनी सलग १५ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा नामुष्कीजनक पराभव झाला. यानंतर पक्षात मोठी फूट पडली.