चेन्नई : तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूचे ९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे राज्यातील दोन प्रमुख द्रविड पक्ष DMK आणि AIADMK यांच्यातील, जवळपास सहा दशकांपासून चालत आलेली आलटून-पालटून सत्ता संपुष्टात आली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उपस्थीत होते. वियज यांच्यासोबत TVK मधील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली.
तामिळनाडूमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच अखेर शनिवारी सुटला. तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला 'द्रमुक'चे मित्रपक्ष असलेल्या व्हीसीके आणि आययूएमएल यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे थलपथी विजय यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना १३ मे पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
१२१ आमदारांचा पाठिंबा
२३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता असताना, जोसेफ विजय यांनी १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांना सुपूर्द केले. गेल्या चार दिवसांत राज्यपालांची ही चौथी भेट होती. पाठिंब्याची खातरजमा झाल्यानंतर राज्यपालांनी विजय यांची तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भव्य सोहळा मुख्यमंत्रीपदाचा हा दिमाखदार शपथविधी सोहळा चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. सत्तेचे समीकरण जुळल्यानंतर आता सर्वांचे लक्ष १३ मे रोजी होणाऱ्या 'फ्लोर टेस्ट'कडे लागले आहे.