पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज (दि.२१) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. गोळीबारामध्ये 20हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने अद्याप याबाबत अधिकृत घाेषणा केलेली नाही. हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. हा हल्ला बैसरन गवताळ प्रदेशाजवळ झाला असून, या हल्ल्यातून वाचलेल्या महिलेने फोनवरून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
पहलगाम पर्यटकांनी गजबजलेले असताना हा हल्ला झाला.गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा दलांना बैसरन भागात पाठवण्यात आले आहे. हल्ला झालेला भागात केवळ पायवाटच आहे येथे वाहत जात नाही. त्यामुळे घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. "पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो, ज्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. अशा प्रकारचा हिंसाचार अस्वीकार्य आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे," असे त्यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे.
काश्मीरने पर्यटकांचे उबदार स्वागत केले आहे. ही दुर्मिळ घटना गंभीरपणे चिंताजनक आहे. गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संभाव्य सुरक्षा त्रुटींची तपासणी करण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.