Taslima Nasreen Kolkata event : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचा बहुचर्चित कोलकाता दौरा शनिवारी चर्चेत राहिला. 
राष्ट्रीय

Taslima Nasreen : तस्लिमा नसरीन यांच्‍या कोलकातामधील कार्यक्रमात गदारोळ, नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध बंगाली कवी जॉय गोस्वामी यांच्‍या उपस्‍थितीला तीव्र विरोध दर्शवत घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

Taslima Nasreen Kolkata event : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचा बहुचर्चित कोलकाता दौरा शनिवारी चर्चेत राहिला. येथील एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध बंगाली कवी जॉय गोस्वामी यांना मंचावर येण्याचे निमंत्रण दिल्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला. प्रेक्षकांच्या एका गटाने कवी गोस्वामी यांच्या उपस्थितीला तीव्र विरोध दर्शवत घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या गदारोळामुळे तस्लिमा नसरीन यांचे भाषण काही काळ थांबवावे लागले.

दोन दशकांनंतर नसरीन कोलकातामध्‍ये

नोव्हेंबर २००७ मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांनंतर तस्लिमा नसरीन यांना कोलकाता सोडावे लागले होते. सुरुवातीला त्यांना जयपूर आणि नंतर केंद्र सरकारच्या सुरक्षेत नवी दिल्लीत हलवण्यात आले होते, ज्यानंतर त्यांनी भारत सोडला होता. या सर्व घडामोडींनंतर शनिवारी तब्बल दोन दशकांनंतरच्या कोलकाता पुनरागमन प्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाषणासाठी निमंत्रित करण्यात आल्यानंतर, नसरीन यांनी समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले आधुनिक बंगाली साहित्यातील नामवंत कवी जॉय गोस्वामी यांना मंचावर येण्याची विनंती केली.

प्रेक्षकांनी केला कवी गोस्‍वामी यांना तीव्र विरोध

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी गोस्वामी जसे मंचाच्या दिशेने जाऊ लागले, तसा प्रेक्षकांमधून तीव्र विरोध आणि ओरड सुरू झाली. वाढता विरोध पाहून गोस्वामी यांना माघारी फिरून पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसावे लागले. या अनपेक्षित घटनेमुळे नसरीन काही क्षण व्यासपीठावर माईकसमोर शांत उभ्या राहिल्या आणि संपूर्ण सभागृह घोषणाबाजीने दुमदुमून गेले.

अखेर नसरीन यांच्‍या आवाहनानंतरच शांतता

आयोजकांनी प्रेक्षकांना वारंवार शांततेचे आवाहन केले, मात्र गदारोळ काही मिनिटे सुरूच राहिला. अखेर नसरीन यांनी स्वतः हस्तक्षेप करत प्रेक्षकांना थेट उद्देशून विचारले, "मी बोलू की नको? मग कृपया शांत व्हा आणि आपापल्या जागेवर बसा." त्यांच्या या आवाहनानंतर सभागृहात शांतता प्रस्थापित झाली आणि त्यांनी आपले भाषण पुढे सुरू केले.

जॉय गोस्‍वामी यांना का झाला विरोध?

तस्लिमा नसरीन यांच्या निर्वासित काळात जॉय गोस्वामी यांनी बाळगलेले मौन आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे संबंध, या गोष्टींमुळे प्रेक्षकांमध्ये हा असंतोष उफाळून आल्याचे मानले जात आहे.२००७ मध्ये तस्लिमा नसरीन यांच्या लेखनाविरुद्ध झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर त्यांना कोलकाता सोडावे लागले होते. त्यावेळी लेखिकेसाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल स्वतः गोस्वामी यांनी भूतकाळात जाहीरपणे खेद व्यक्त केला होता. त्‍यांनी स्वतःला "दोषी" मानले होते. मात्र, तस्लिमा यांच्या या सांकेतिक 'गृहवापसी' कार्यक्रमात गोस्वामी यांनी त्यांच्यासोबत मंच सामायिक करावा, हे स्वीकारण्याच्या मनःस्थितीत प्रेक्षक नव्हते.

"अन्याय दीर्घकाळ असू शकतो, पण तो कायमस्वरूपी नसतो"

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी यांनी राज्य सचिवालयात नसरीन यांचा नागरी सत्कार केल्यानंतर काही तासांतच हा कार्यक्रम पार पडला. तब्बल १९ वर्षांनंतर नसरीन यांचा हा पहिलाच कोलकाता दौरा होता. आपल्या भाषणात तस्लिमा नसरीन यांनी आपल्या पुनरागमनाचे वर्णन 'मागे सुटलेल्या आयुष्याच्या एका भागाकडे परतणे' असे केले. त्या म्हणाल्या, "माझी ही गृहवापसी सिद्ध करते की अन्याय दीर्घकाळ असू शकतो, पण तो कधीही कायमस्वरूपी असू शकत नाही." तसेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल भविष्यात कोणत्याही लेखकाला निर्वासित व्हावे लागणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT