

Taslima Nasreen Kolkata Return : निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन तब्बल १९ वर्षानंतर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे परतत आहेत. १ ऑगस्ट रोजी रवींद्र सदन येथे आयोजित कट्टरतावाद-विरोधी एका कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.
तत्कालीन डाव्यांच्या (लेफ्ट) सरकारच्या काळात तस्लीमा नसरीन यांच्याविरोधात तीव्र निदर्शने झाली होती. त्यावेळी परिस्थिती इतकी बिघडली होती की, कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याच कारणामुळे २००७ मध्ये तसलिमा नसरीन यांना कोलकाता सोडावे लागले होते. तेव्हापासून त्यांनी कोलकाता येथे परतण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु सुरक्षा कारणांचे दाखले देत त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. परिणामी, गेल्या १९ वर्षांत त्यांना कोलकाता येथे परतता आले नव्हते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद यश मिळवले. राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर तसलिमा नसरीन यांच्या कोलकाता पुनरागमनाचा योग जुळून आला आहे.नसरीन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. यामुळे साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळात आता एका नव्या चर्चेला उधाण आले आहे.
तस्लीमा नसरीन यांच्या 'लज्जा' कादंबरीने बांगलादेशमध्ये खळबळ माजावली होती. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या धार्मिक अत्याचार, हिंसाचार आणि छळाचे वास्तववादी चित्रण या कादंबरीत केले. त्यावेळी बांगलादेशातील इस्लामी कट्टरपंथियांनी त्यांच्याविरोधात फतवा जारी केला होता आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. कांदबरीमुळे तस्लीमा यांना १९९४ मध्ये बांगलादेश सोडावा लागला. त्यानंतर दोन महिने अज्ञातवासात राहिल्यानंतर, १९९४ च्या अखेरीस त्या स्वीडनला निघून गेल्या. या तेव्हापासून त्या सातत्याने हद्दपारीचे जीवन जगत आहेत. बांगलादेशात त्यांच्या अनेक पुस्तकांवर बंदी देखील घालण्यात आली आहे.
तस्लीमा यांना कोलकाता येथील 'सेक्युलर मिशन' आणि 'एचआरबीएफएफ' (HRBFF) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे. आयोजकांच्या मते, कट्टरतावादाविरोधातील त्यांची दीर्घकालीन भूमिका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा सन्मान करण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आले आहे. लेखिकेने स्वतः फेसबुकवर पोस्ट करत कोलकाता येथे येत असल्याची घोषणा केली आहे. तस्लीमा नसरीन यांनी उस्मान मलिक नावाच्या व्यक्तीची फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये उस्मान मलिक यांनी लिहिले आहे की, "दीर्घ प्रतीक्षेचा अखेर अंत झाला. १८ वर्षे, ८ महिने आणि १० दिवसांनंतर... सर्व प्रतिगामी शक्तींना पराभूत करून त्या परतत आहेत. आम्ही त्यांच्या या लढ्यात कालही सोबत होतो, आजही आहोत आणि पुढेही कायम सोबत राहू."