Tamil Nadu Accident
कोइम्बतूर: तामिळनाडूतील वालपराई-पोल्लाची घाटात शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. पर्यटकांची गाडी खोल दरीत कोसळल्याने केरळमधील ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मल्लापुरम जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील पाच शिक्षिकांचा समावेश आहे.
केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील पेरिंथलमन्ना येथून १३ जण वालपराई येथे पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी संध्याकाळी ५:१५ च्या सुमारास परतत असताना, घाटातील १३ व्या तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व्हॅन रस्त्यावरून घसरत दाट जंगलातून खाली कोसळली आणि नवव्या वळणाजवळ जाऊन थांबली. अपघात इतका भीषण होता की नऊ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातातील मृतांमध्ये पलपराम येथील शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षिका आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. अजिता (५४), रामला (५२), सुहरा (४३), आशा (४१), मजीथ (४३), सजिता (४५), शकीला (३७), रुकिया (३९) आणि हिशाम (१२), अशी मृतांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच वालपराईचे पोलीस उपअधीक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल आणि परिसर दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र, पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर जखमींना बाहेर काढून तातडीने पोल्लाची येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये नौशाथ (३९), शहादिन (११), माइजिन (१०) आणि चालक मोहम्मद फासिथ (२१) यांचा समावेश असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कोइम्बतूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.
या घटनेनंतर कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी पवनकुमार जी. गिरियप्पनवर यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे झालेला अपघात अत्यंत वेदनादायी आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो."