file photo.
राष्ट्रीय

Custodial Death Case | पोलिस कोठडीत छळामुळे पिता-पुत्राचा मृत्यू; न्यायालयाने ९ पोलिसांना सुनावली फाशीची शिक्षा

Custodial Death Case | तामिळनाडूच्या साथानकुलम येथे पोलिस कोठडीत झाला होता पिता-पुत्राचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

या खटल्‍यातील पहिला आरोपीला २४ लाख तर दुसऱ्या आरोपीला (A2) १६.३० लाख रुपये असे मृत बेनिक्सच्या आईला १.४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्‍याचे आदेशही न्‍यायालयाने दिले आहेत.

Custodial Death Case

मदुराई: तामिळनाडूच्या साथानकुलम येथे पोलिस कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मदुराई येथील एका स्थानिक न्यायालयाने आज (दि. ६) ऐतिहासिक निकाल दिला. मदुराईचे पहिले अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. मुथुकुमारन यांनी नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०२० मध्ये साथानकुलम (जि. थुथुकुडी) येथील व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा पोलिस कोठडीत छळ केल्याप्रकरणी आणि त्यानंतर झालेल्या मृत्यूसाठी या पोलिसांना दोषी ठरवण्यात आले. या खटल्‍यातील पहिला आरोपीला २४ लाख तर दुसऱ्या आरोपीला (A2) १६.३० लाख रुपये असे मृत बेनिक्सच्या आईला १.४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले असून, आरोपी नुकसानभरपाई देण्यात अपयशी ठरले, तर त्यांची मालमत्ता जप्त करून विकली जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम पीडितांच्या कुटुंबाला दिली जाईल, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

प्रकरण काय?

१९ जून २०२० रोजी जयराज हे त्यांच्या मुलाच्या मोबाईल शोरूममध्ये असताना, कोविड-१९ संचारबंदीच्या काळात दुकानाच्या निर्धारित वेळेनंतरही दुकान उघडे ठेवल्याच्या आरोपावरून आरोपी पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेले. जेव्हा बेनिक्स पोलिस ठाण्यात गेला. त्याने वडिलांच्या सुटकेची विनंती केली, तेव्हा आरोपी पोलिसांनी बेनिक्सच्या डोळ्यांदेखतच जयराज यांना शिवीगाळ केली. त्यांच्याशी गैरवर्तन केले. यामुळे बेनिक्स आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर, पोलिसांनी त्या पिता-पुत्राचा रात्रभर पोलिस ठाण्यात अत्यंत क्रूरपणे छळ केला.

पिता-पुत्राचा पोलिस कोठडीत मृत्यू

साथानकुलमच्या न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावली. दुसऱ्या दिवशी त्यांना वैद्यकीय उपचार न देताच कोविलपट्टी उप-कारागृहात ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती वेगाने खालावली. २२ जून २०२० रोजी कोविलपट्टी येथील सरकारी रुग्णालयात बेनिक्सचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी जयराज यांचेही निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात कोविलपट्टी पूर्व पोलिस ठाण्यात दोन एफआयआर (गुन्हे) दाखल करण्यात आले होते.

कोरोनामुळे एका पोलिसाचा मृत्यू

या प्रकरणाची तपास सीबीआयकडे सोपविण्‍यात आला. आरोपींपैकी एक असलेला SSI पल्दुराई याचा ऑगस्ट २०२० मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. २५ सप्टेंबर २०२० रोजी, CBI ने उर्वरित नऊ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आणि या खटल्याची सुनावणी १० मार्च २०२१ रोजी मदुराई येथील 'प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात' सुरू झाली.

सीबीआयने दोषारोपत्रात काय म्‍हटलं?

ऑगस्ट २०२२ मध्ये CBI ने एक पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्रांतून उघड झाले की, मृत व्यक्तींनी (पीडितांनी) आपले दुकान निर्धारित वेळेनंतरही उघडे ठेवले नव्हते; उलट, त्यांना एका खटल्यात खोट्या पद्धतीने गोवण्यात आले होते. या घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका महिला 'हेड कॉन्स्टेबल'च्या जबाबातून असे समोर आले की, संपूर्ण रात्रभर अमानुष मारहाण (छळ) करण्याव्यतिरिक्त, मृत व्यक्तींना त्यांच्याच शरीरावरील जखमांमधून वाहणारे रक्त पोलीस ठाण्याच्या जमिनीवर साचले होते. पुसून काढण्यासाठी स्वतःच्याच बनियानचा वापर करण्यास भाग पाडण्यात आले होते.

चार वर्षांहून अधिक काळ चाललेला खटला

शवविच्छेदन अहवालातून असे निष्पन्न झाले की, बेनिक्सच्या शरीरावर बाह्य स्वरूपाच्या १३ जखमा होत्या, तर जयराजच्या शरीरावर १७ जखमा होत्या. सर्वच जखमा 'बोथट वस्तूंच्या' आघातामुळे झाल्या होत्या आणि या जखमांमधून उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळेच त्या दोघांचा मृत्यू झाला होता. चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर, २३ मार्च रोजी न्यायालयाने त्या नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले jh;s;. शिक्षेच्या प्रमाणाबाबत युक्तिवाद करताना, CBI च्या विशेष सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, या प्रकरणामुळे समाजाची सद्सद्विवेकबुद्धी हादरून गेली आहे आणि हे प्रकरण 'अतिशय दुर्मिळ' (rarest of rare) प्रकरणांच्या श्रेणीत मोडते. त्यांनी असा दावा केला की, दोषींना मृत्युदंडाची शिक्षा किंवा निदान जन्मठेपेची (मृत्यू होईपर्यंत कारावास) शिक्षा तरी नक्कीच मिळायला हवी.

आरोपींना फाशीची शिक्षा

पीडित पक्षाच्या वकिलांनी आरोपीच्‍या वकिलांच्‍या युक्तिवादाचे खंडन करताना स्‍पष्‍ट केले की, आरोपींना आपल्या कृत्यांच्या परिणामांची पूर्ण जाणीव होती; यावरूनच त्यांच्या सुधारणेला कोणताच वाव नसल्याचे स्पष्ट होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की हे प्रकरण खरोखरच "अति-दुर्मिळातील दुर्मिळ" या श्रेणीत मोडते आणि परिणामी, त्यांनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्या नऊ पोलिसांमध्ये तत्कालीन निरीक्षक एस. श्रीधर; उपनिरीक्षक पी. रघु गणेश आणि के. बालकृष्णन; हवालदार एस. मुरुगन आणि ए. सामीदुराई; तसेच शिपाई एम. मुथुराजा, एस. वेल मुथु, एस. चेल्लादुराई आणि एक्स. थॉमस फ्रान्सिस यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT