supreme court  File Photo
राष्ट्रीय

Supreme Court : खटला दाखल करण्यापूर्वी हस्तांतरित झालेल्‍या मालमत्तेवर 'जप्ती' लादता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

'न्यायनिवाड्यापूर्वी'ची जप्ती हा एक अपवादात्मक आणि बचावात्मक उपाय असल्‍याचीही स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court on Property Transferred case

नवी दिल्ली: जर एखादी मालमत्ता खटला दाखल होण्यापूर्वीच विकली गेली असेल, तर त्या मालमत्तेवर दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) च्या आदेश ३८, नियम ५ नुसार जप्ती लादली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

प्रकरण काय होते?

'लाईव्‍ह लॉ'च्‍या रिपोर्टनुसार, याचिकाकर्त्याचे पूर्वज एल.के. प्रभू यांनी १० मे २००२ रोजी व्ही. रामानंदा प्रभू यांच्यासोबत विक्रीचा करार केला होता. ठरलेली रक्कम भरल्यानंतर, २८ जून २००४ रोजी एल.के. प्रभू यांच्या नावाने एक नोंदणीकृत विक्री दस्तऐवज तयार करण्यात आला. खरेदीदाराने मालमत्तेचा ताबा घेऊन त्यावर गेस्ट हाऊस सुरू केले. यानंतर डिसेंबर २००४ मध्ये कर्जदाराविरुद्ध पैशांचा खटला दाखल केला आणि फेब्रुवारी २००५ मध्ये त्याच मालमत्तेवर 'न्यायनिवाड्यापूर्वी जप्ती' मिळवली. या जप्तीला आव्हान देत खरेदीदाराने अर्ज दाखल केला. तो अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने म्हटले की, हे हस्तांतरण मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या (TPA) कलम ५३ नुसार फसवणुकीच्‍या उद्देशाने केलेले हस्तांतरण आहे. केरळ उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा युक्तिवाद ग्राह्य धरला; परंतु मोबदल्याच्यामर्यादित प्रश्नावर पुनर्विचार करण्यास सांगितले. खरेदीदाराने उच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालास आव्‍हान देणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली.

'न्यायनिवाड्यापूर्वी जप्ती'चा अधिकार नाही : याचिकाकर्त्याचा युक्‍तीवाद

याचिकाकर्त्याने युक्तिवाद केला की, ‘निर्णयापूर्वी जप्ती’ चा आदेश कायम ठेवण्यायोग्य नव्हता, कारण खटला दाखल होण्यापूर्वी सुमारे सहा महिने अगोदरच विक्री दस्तऐवज तयार झाले होते. हमदा अम्माल विरुद्ध अवदियप्पा पाथर (१९९१) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवाला देत, वकिलांनी युक्तिवाद केला की, खटला दाखल करताना मालमत्ता प्रतिवादीची नव्हती, ती जप्त करण्याचा अधिकार कोर्टाला आदेश XXXVIII नियम ५ अंतर्गत नाही.

सर्वोच्‍च न्‍यायालय नेमकं काय म्‍हणाले?

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने अपीलकर्त्याचा युक्तिवाद मान्य केला. त्यांनी स्‍पष्‍ट केले की, प्रतिवादी आपली मालमत्ता नष्ट करू नये म्‍हणून निर्णयापूर्वी जप्ती करण्याचा अधिकार फक्त वादीच्या संभाव्य डिक्रीचे ( न्यायालयाच्या निर्णयाचा भाग) संरक्षण करण्यापुरता मर्यादित आहे ज्या मालमत्तेची जप्ती करायची आहे, ती खटला दाखल करण्याच्या तारखेला प्रतिवादीची असायला हवी; खटल्यापूर्वी आधीच हस्तांतरित केलेली मालमत्ता या तरतुदीनुसार (ऑर्डर ३८ नियम ५ सीपीसी) जोडता येत नाही.” असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने केरळ उच्च न्यायालय आणि खटल्याच्या न्यायालयाच्या समवर्ती निष्कर्ष रद्द केला.

सत्र न्‍यायालयासह केरळ उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द

न्यायालयाने स्पष्ट केले की, दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश ३८, नियम ५ चा उद्देश केवळ, खटला प्रलंबित असताना आरोपीने मालमत्ता विकून अंमलबजावणी विफल करू नये, यासाठी आहे. तसेच जप्तीसाठी विचारात घेतलेली मालमत्ता खटला दाखल करण्याच्या तारखेला आरोपीच्या मालकीची असणे आवश्यक आहे. या प्रकरणात नोंदणीकृत विक्रीपत्र खटला दाखल करण्याच्या अनेक महिने आधी, म्हणजेच २८.०६.२००४ रोजी केले गेले होते. त्यामुळे, खटला दाखल करताना मालमत्ता हस्तांतरित झाली होती आणि ती आरोपीच्या मालकीची नव्हती. अशा परिस्थितीत, जप्तीसाठी आवश्यक असलेली अट पूर्ण होत नाही." या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने खरेदीदाराविरोधात सत्र न्‍यायालय आणि केरळ उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत विक्री दस्तऐवज वैध ठरवून दावा याचिका स्वीकारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT