नवी दिल्ली ः पत्नी शिक्षित आहे किंवा तिला पालकांचा पाठिंबा आहे या सबबीवर घटस्फोटानंतरही पती आपल्या माजी पत्नीला सांभाळण्याच्या कर्तव्यापासून पळ काढू शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
“आपल्या समाजात विवाह ही एक संस्था म्हणून भावनिक बंध, सहवास आणि परस्पर पाठिंब्यावर आधारलेली आहे. तिचे मूल्य केवळ पैशात करता येत नाही. स्थिर आणि सन्माननीय जीवन जगण्याच्या कायदेशीर अपेक्षेसह एक स्त्री विवाह करते. जेव्हा असा विवाह तुटतो तेव्हा पत्नीला सन्मानाने जगता यावे यासाठी केवळ ती शिक्षित आहे किंवा तिच्या पालकांचा पाठिंबा आहे या कारणास्तव पतीचे कर्तव्य संपत नाही. ती पतीबरोबर असताना ज्या दर्जाचे जीवन जगते तसेच जीवन जगण्याचा अधिकार तिला घटस्फोटानंतरही आहे, असे मत न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने व्यक्त केलेे.
तसेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली संबंधित महिलेची याचिकाही मंजूर केली. कुटुंब न्यायालयाने ठरवलेल्या दरमहा केवळ 15,000 रुपये पोटगी देण्याच्या निर्णयाविरुद्ध तिची याचिका विचारात घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. पोटगी वाढवून देण्याची मागणी तिने केली होती.