Split In Samajwadi Party: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फोडल्यानंतर आता पुढचा नंबर हा उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी हा दावा केला आहे. येणाऱ्या काळात समाजवादी पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राजभर यांनी महाराष्ट्र बंगाल सोडून द्या संपूर्ण समाजवादी पक्ष भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहे असा दावा त्यांनी केला आहे.
राजभर यांनी हे वक्तव्य उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे अशावेळी केलं आहे. उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप आणि समजावादीमध्ये थेट लढत असणार आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष आपल्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, समाजवादीचे प्रवक्ते सुनील राज यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि त्यांचे सहकारी हे सैरभैर झाले आहेत. राजभर यांना आपलं दुकान चालवायचं आहे त्यामुळं ते अशी वक्तव्ये करत आहेत असं सुनील राज यांनी सांगितलं.
सुनील यांनी सांगितलं की समाजवादी पक्षाने २०२४ च्या निवडणुकीत भाजपला अर्ध्यावर आणून ठेवलं होतं. २०२७ मध्ये भाजपला युपीतून पूर्ण साफ करू. सुनील यांनी विधानसभा निवडणुकीत राजभर यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. काहीही बोलणं हे राजभर यांची सवय असल्याचा देखील वक्तव्य सुनील यांनी केलं.
दरम्यान, ओम प्रकाश राजभर यांनी जसजसे समाजवादीचे मोठे नेत्यांवर एजन्सीचा फास आवळत आहे तसतशी त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढत आहे. रिव्हर फ्रंड योजना आणि उत्खनन घोटाळ्यात कोण कोण आहे हे संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे. जसजसा तपास पुढे जाईल तसतसा त्यांची अडचणी वाढणार आहेत.
ओम प्रकाश राजभर यांनी जरी मोठ्या फूटाचा दावा केला असला तरी त्यांनी यातील नेत्यांची नावे मात्र सांगितली नाही. राजभर यांनी आपल्या वक्तव्यात सपाचे वरिष्ठ नेते रामगोपाल यादव यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितलं की रामगोपाल यादव यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचं देखील सांगितलं.