sonam wangchuk said wants rahul gandhi make him break fast different plan sansad march
पुढारी ऑनलाईन : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सांगितले की, २० जुलैला संसद मार्च करण्याबाबत त्यांची योजना वेगळी होती. त्यांना शांततेच्या मार्गाने संसदेकडे जायचे होते. त्यांनी सांगितले की, राहुल गांधींनी ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवावे, अशी त्यांची इच्छा होती.
नीट पेपर लीकच्या विरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाबरोबरच २० जुलैच्या संसद मार्चबाबत ३६ दिवस उपोषण करणारे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांना राहुल गांधींच्या हस्ते आपले उपोषण सोडवून घ्यायचे होते. सन्मानजनक पद्धतीने आपले उपोषण संपवावे, अशी त्यांची इच्छा होती. तसेच २० जुलैच्या संसद मार्चसाठी नेमकी काय योजना होती, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
२० जुलैची योजना काही औरच होती
वांगचुक म्हणाले, “आम्ही म्हटले होते की, आणखी १२ दिवस कसातरी उपोषण करू. मात्र २० जुलैला आम्ही संसदेकडे जाऊ आणि खासदारांना आमचे निवेदन देऊ. त्यानंतर आम्ही विचारले की, २० जुलैला किती लोक येऊ शकतात? आशुतोष यांनी १० हजार, तर सौरभ यांनी १५ हजार लोक येतील असे सांगितले. त्यांची अपेक्षा साधारण एवढीच होती. मात्र मला वाटत होते की, एक लाखांहून अधिक लोक येतील.”
ते पुढे म्हणाले, “जर सत्ताधारी पक्षाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही विरोधी पक्षाच्या खासदारांची भेट घेऊ, असे ठरवले होते. पवन खेडा हेदेखील मंचावर आले होते. आमची अपेक्षा होती की, विरोधी पक्षातील लोक आम्हाला स्वीकारतील. आम्ही कधीही तोडफोड होईल, असा विचार केला नव्हता.”
वांगचुक यांनी सांगितले की, त्यांचा उद्देश संसदेत जाऊन खासदारांना हा मुद्दा समजावून सांगणे आणि निवेदन सोपवणे हा होता. “आम्हाला खासदारांना सांगायचे होते की, आमच्याकडून जे काही शक्य होते ते आम्ही केले. आता तुम्ही याची जबाबदारी घ्या आणि संसदेतून यावर मार्ग काढा,” असे ते म्हणाले.
यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते उपोषण सोडवण्याची कल्पना होती. आंदोलनाचा सन्मानजनक पद्धतीने शेवट कसा करता येईल, याचाच विचार ते करत होते.
वांगचुक म्हणाले, “आमची विचारसरणी अशी होती की, जर सरकारकडून कोणी आले नाही, तर विरोधी पक्षाचे नेते ज्यूस पाजून माझे उपोषण सोडवतील आणि त्यानंतर पुढची जबाबदारी स्वीकारतील. मात्र १८ तारखेला मला जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले.”
अभिजीत दीपके यांनीही सोनम वांगचुक यांच्याबाबत दिले वक्तव्य
अभिजीत दीपके यांनीही एका मुलाखतीदरम्यान सोनम वांगचुक यांच्याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, सोनम वांगचुक हे त्यांच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. त्यांच्या उपोषणामुळे आणि खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे त्यांनाही चिंता वाटत होती. मात्र वांगचुक उपोषण सोडण्यास तयार नव्हते.
दीपके म्हणाले, “नंतर त्यांना किडनॅप करण्यात आले. तिथे त्यांना केवळ सरकारमधील लोकच भेटू शकत होते. आम्हाला त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे अखेर त्यांनाच स्वतःच्या हाताने उपोषण सोडावे लागले.”