CJP Protest file photo
राष्ट्रीय

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टी आता संसदेवर धडकणार; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काढणार मोर्चा

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करावी, या मागणीसाठी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली २० जुलैला संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

CJP Protest

नवी दिल्ली: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करावी, अशी मागणी 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) कडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली २० जुलैला संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२० जुलै) संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे 'कॉकरोच जनता पार्टी'ने जाहिर केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी याद्वारे केली जाणार आहे. जंतर-मंतरवर बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १३ वा दिवस आहे. त्यांचे वजन सुमारे ७ किलोपेक्षा जास्त घटले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच ठाकरे गटाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील प्रचंड पावसातही विद्यार्थ्यांचे आंदोलन (२० वा दिवस) सुरू असून, संरक्षणासाठी ताडपत्री आणि तंबू उभारण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नसल्याचा आरोप 'सीजेपी'चे नेते अभिजीत दिपके यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंकडून सोनम वांगचुक यांची दूरध्वनीवरुन विचारपूस

नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि अभिजीत दिपके यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दूरध्वनीवरून वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाविरोधात सोशल मीडियातून उभी राहिलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या माध्यमातून देशभर विद्यार्थी आंदोलन सुरू असून, त्याचाच भाग म्हणून सोनम वांगचुक जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करत आहेत. आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अरविंद सावंत यांनी विद्यार्थ्यांचा लढा न्याय्य असल्याचे सांगितले. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सावंत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT