Shatrughan Sinha : कठीण काळात ममता बॅनर्जींनी साथ दिली, आता दु:खाच्या काळात...शत्रुघ्न सिन्हा बंडखोरीवर काय म्हणाले..  file photo
राष्ट्रीय

Shatrughan Sinha : कठीण काळात ममता बॅनर्जींनी साथ दिली, आता दु:खाच्या काळात...शत्रुघ्न सिन्हा बंडखोरीवर काय म्हणाले..

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा पराभव झाल्यानंतर पक्षात मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

shatrughan sinha refuses to rebel says will not abandon mamata banerjee in this hour of her bad time

कोलकाता : पुढारी ऑनलाईन तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये मोठी फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाविरोधात बंड करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, कठीण काळात ममता बॅनर्जी यांनी त्यांना साथ दिली होती, त्यामुळे दुःखाच्या काळात ते त्यांची साथ सोडणार नाहीत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा पराभव झाल्यानंतर पक्षात मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. सुमारे 20 खासदारांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी मात्र आपण ममता बॅनर्जींसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "माझ्या अडचणीच्या काळात ममता बॅनर्जी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे मी त्यांना अशा वेळी सोडू शकत नाही."

बंगालमधील पराभवानंतर टीएमसीमधील अनेक आमदार आणि खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेत 64 आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन केला असून, ऋतब्रत हे विरोधी पक्षनेते बनले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतही मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.

ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली अनेक खासदार या गटात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सायोनी घोष, युसुफ पठाण यांच्यासह सुमारे 19 खासदारांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या यादीत शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव असल्याची चर्चा होती; मात्र त्यांनी गुरुवारी यास नकार दिला.

आसनसोलचे टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, "कठीण काळात टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी माझ्यासोबत उभ्या राहिल्या. त्यामुळे मी त्यांची साथ सोडणार नाही. ममता बॅनर्जी आणि टीएमसीसोबत राहणे हे माझे कर्तव्य आहे."

सिन्हा यांनी पुढे सांगितले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पटना साहिब मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या होत्या ज्यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी त्यांना आसनसोलमधून उमेदवारी दिली आणि लोकसभेत निवडून येण्यास मदत केली. बंडखोर खासदारांच्या यादीवर त्यांनी स्वाक्षरी केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, टीएमसीचे राज्यसभा सदस्य प्रकाश चिक बराईक यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वासह पक्षाचाही राजीनामा दिला. पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपला दिलेल्या जनादेशाचा आदर करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्यानंतर या आठवड्यात पक्ष सोडणारे बराईक हे तिसरे टीएमसी खासदार ठरले आहेत.

बराईक यांनी राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्यानंतर भाजप नेते निशिकांत दुबे यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, "पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. तृणमूल काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. जनतेच्या या निर्णयाचा आदर करत मी पक्षाचा राजीनामा देत आहे."

राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे, "मी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारावा."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT