पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागाला शुक्रवारी संध्याकाळी धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावरील विमान वाहतूक ठप्प झाली. यामुळे शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. यामुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला.
द टाईम्स ऑफ इंडियाने विमानतळ सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवार सकाळपर्यंत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या सुमारे ५० देशांतर्गत विमानांना विलंब झाला. तर सुमारे २५ विमानांचा मार्ग बदलण्यात आला. धुळीच्या वादळामुळे सात विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी या झालेल्या गैरसोयीबद्दल सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. अनेक प्रवाशांनी बोर्डिंग गेटवरील गर्दी आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गैरवर्तनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विमानतळावर मोठा गोंधळ उडाला असून चेंगराचेंगरीसाठी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
विमानतळावरील सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटे एकाचवेळी मार्ग बदललेल्या आणि उशिराने उतरणाऱ्या विमानांमुळे बोर्डिंग गेट्सवर अचानक गर्दी वाढली. "धुळीच्या वादळानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक विमाने उड्डाणे वळवण्यात आली आणि रद्द करण्यात आली. यामुळे दिल्ली विमानतळावर प्रवाशांची गैरसोय झाली. ज्या विमानांचा मार्ग बदलण्यात आला त्यांना दिल्लीत पोहोचण्यास उशीर लागला. यामुळे विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली." असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.