Sanjay Raut Statement On India Slave To USA: "देशाला ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी प्राणांची आहुती दिली. मात्र, आज ज्या प्रकारे भारत जागतिक पातळीवर आणि विशेषतः इराण-अमेरिका संघर्षात भूमिका घेत आहे, ते पाहता आपण पुन्हा अमेरिकेच्या गुलामगिरीकडे तर झुकत नाही ना?" असा खळबळजनक आणि गंभीर सवाल शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत एका सार्वभौम राष्ट्राप्रमाणे वागण्याऐवजी अमेरिकेच्या प्रभावाखाली असल्यासारखा वाटत आहे. "ज्या देशाला आपण दीडशे वर्ष लढा देऊन स्वतंत्र केले, तो देश आज पुन्हा एकदा जागतिक महासत्तेचा (अमेरिका) मांडलिक होत असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक आहे," असे विधान राऊत यांनी केले.
केवळ परराष्ट्र धोरणच नाही, तर देशांतर्गत लोकशाहीवरही राऊत यांनी टीका केली. लोकसभा अध्यक्षांविरुद्ध आणलेल्या अविश्वास ठरावाचे समर्थन करताना ते म्हणाले, "सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे माईक बंद केले जातात. सरकार विरोधकांचा आवाज ऐकायला तयार नाही. ही एक प्रकारची 'अप्रत्यक्ष गुलामगिरी' आणि हुकूमशाहीच आहे. जेव्हा देशाचे सर्वोच्च सभागृह एका पक्षाच्या इशाऱ्यावर चालते, तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरतो."
पश्चिम बंगालमधील वादाचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, सरकार एका बाजूला आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या सन्मानाची भाषा करते, पण दुसऱ्या बाजूला मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर मौन बाळगते. हे दुटप्पी धोरण असून राष्ट्रपतींच्या पदाचा वापर केवळ राजकारणासाठी करणे हाच त्यांचा खरा अपमान असल्याचे राऊत यांनी नमूद केले.