Ram Mandir Donation Controversy Pudhari
राष्ट्रीय

Ram Mandir: राम मंदिर वादाचा परिणाम; देणगीत 80 टक्के घट, चोरीमुळे भक्तांचा संताप,15 दिवसांत किती कोटी जमा झाले?

Ram Mandir Donation Controversy: अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीदरम्यान देणगीत मोठी घट झाल्याचा दावा केला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ram Mandir Donation Controversy: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी कारण आहे मंदिरातील देणगीशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरण. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच मंदिरात येणाऱ्या देणगीच्या रकमेत मोठी घट झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंदिराशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपर्यंत दरमहा सरासरी सुमारे 7 कोटी रुपयांची देणगी मंदिराला मिळत होती. मात्र अलीकडच्या काळात ही रक्कम घटून सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत आल्याचे सांगितले जात आहे. हे आकडे खरे ठरल्यास देणगीत जवळपास 80 टक्क्यांची घट झाल्याचे चित्र आहे.

राम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे मंदिरातील देणगी व्यवस्थापनाबाबत गैरव्यवहाराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. देणगीची रक्कम कशी हाताळली जाते, तिचा वापर कुठे होतो आणि त्यात पारदर्शकता आहे का, असे प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारले जात आहेत.

दरम्यान, स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही अहवालांमुळे या वादाला आणखी हवा मिळाली आहे. चौकशीदरम्यान देणगी मोजणीशी संबंधित काही सीसीटीव्ही फुटेज हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे फुटेज तांत्रिक कारणामुळे नष्ट झाले की जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आले, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय देणगी मोजण्याची जागा आणि प्रक्रिया वेळोवेळी बदलण्यात आल्याच्याही चर्चा आहेत. तपास यंत्रणा या बदलांची नोंदी आणि देखरेख व्यवस्थेवर काही परिणाम झाला का, याची माहिती घेत आहे. काही पुजारी आणि मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचाऱ्यांकडूनही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

हा वाद केवळ देणगीपुरता मर्यादित नसल्याचेही बोलले जात आहे. मंदिर ट्रस्टच्या काही निर्णयांबाबत तसेच जमीन खरेदीशी संबंधित व्यवहारांबाबतही चौकशीचा विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही.

राम मंदिर आंदोलनाशी संबंधित काही संत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर कोणतीही अनियमितता झाली असेल तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या मते, मंदिराची प्रतिष्ठा आणि कोट्यवधी भक्तांचा विश्वास कायम राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.

सध्या भाविकांच्या मनात एकच प्रश्न आहे, प्रभू श्रीरामांच्या नावाने अर्पण करण्यात आलेल्या देणगीची जबाबदारी नेमकी कोणाची? आता या प्रकरणाच्या चौकशी अहवालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तपासातून नेमके काय समोर येते आणि मंदिर प्रशासन यावर काय भूमिका घेते, यावर पुढील घडामोडी अवलंबून असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT