Rajya Sabha Election Results 2026
नवी दिल्ली: राज्यसभेच्या रिक्त असलेल्या ११ जागांसाठी सोमवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. बिहार, ओडिशा आणि हरियाणामध्ये झालेल्या या मतदानात भाजपने दोन जागांवर अतिरिक्त विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. बिहार आणि ओडिशात विरोधकांचा बुरूज ढासळल्याने 'एनडीए'चा मार्ग सोपा झाला, तर हरियाणामध्ये निसटत्या विजयाने काँग्रेसची अब्रू वाचली.
बिहारमध्ये ५ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात होते. आकडेवारीनुसार पाचव्या जागेसाठी संघर्ष होणार हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री नितीश कुमार, नितीन नवीन (भाजप), रामनाथ ठाकूर (जेडीयू), उपेंद्र कुशवाहा (आरएलएम) आणि शिवेश राम (भाजप) हे पाचही 'एनडीए'चे उमेदवार विजयी झाले.
विजयासाठी ४१ मतांची गरज होती. आरजेडी-काँग्रेसच्या 'महागठबंधन'कडे ३५ मते होती, तर 'एमआयएम' आणि 'बसपा'च्या पाठिंब्यानंतर विरोधी उमेदवार ए.डी. सिंह यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे ३ आणि आरजेडीचा १ असे एकूण ४ आमदार मतदानासाठी गैरहजर राहिले.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये निकाल न लागल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली, ज्यात भाजपच्या शिवेश राम यांनी बाजी मारली. या पराभवानंतर विरोधकांनी भाजपवर 'घोडेबाजारा'चा आणि आमदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे.
ओडिशात ४ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी ३० मतांची गरज होती. भाजपचे मनमोहन सामल, सुजीत कुमार आणि बीजेडीचे संतृप्त मिश्रा विजयी झाले. दरम्यान, एका मोठ्या अनपेक्षित निकालात, भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार दिलीप राय यांनीही विजय संपादन केला.
१४७ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत, बीजेडी आणि काँग्रेसकडे त्यांचे संयुक्त उमेदवार डॉ. दत्तेश्वर यांच्या विजयासाठी पुरेशी मते उपलब्ध होती. बीजेडीचे आठ आमदार (ज्यामध्ये सध्या निलंबित असलेल्या दोन आमदारांचा समावेश आहे) आणि काँग्रेसच्या तीन आमदारांनी आपापल्या पक्षांच्या निर्देशांचे उल्लंघन केले आणि भाजपने पाठिंबा दिलेल्या दिलीप राय यांच्या बाजूने 'क्रॉस-व्होटिंग' केले.
बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक यांनी भाजपवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना हाताशी धरून आमदारांना विकत घेतल्याचा आरोप केला आहे. आता बंडखोर आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी पक्ष करत आहे.
हरियाणात दोन जागांसाठी मतदान पार पडले; मात्र, मतदानाची गोपनीयता भंग झाल्याच्या तक्रारींमुळे मतमोजणी पाच तासांहून अधिक काळ थांबवण्यात आली होती. रात्री उशिरा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. भाजपचे उमेदवार संजय भाटिया यांनी एक जागा जिंकली, तर काँग्रेसचे उमेदवार कर्मवीर बौद्ध दुसऱ्या जागेवर विजयी झाले. अपक्ष उमेदवार सतीश नांदल यांना पराभवाचा सामना करावा लागला. संजय भाटिया यांना ३१ मते मिळाली, कर्मवीर बौद्ध यांना २८, तर सतीश नांदल यांना २७ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार कर्मवीर बौद्ध यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवला.
गेल्या महिन्यात, निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. यापैकी, सात राज्यांमधील २६ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले नाही; कारण या प्रत्येक जागेसाठी केवळ एकच उमेदवार निवडणूक लढवत होता. बिनविरोध निवडून आलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि द्रमुकचे (DMK) तिरुची शिवा यांचा समावेश आहे.