Parliament Monsoon Session
नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांविरुद्ध झालेल्या पोलीस कारवाईवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच गदारोळ सुरू आहे. या पोलीस कारवाईबाबत आणि 'पेलेट गन्स'च्या वापराबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. सभागृहातील गोंधळामुळे आज राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना "विरोधकांची भूमिका गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचवा" अशी सुचना दिली.
२० जुलै रोजी, तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे, या मागणीवरून गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाळी अधिवेशनाचे कामकाज वारंवार स्थगित होत आहे.
आज दुपारी १२ वाजता राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्री आणि पंतप्रधानांना सभागृहात बोलावण्याची मागणी केली. खर्गे म्हणाले, "आम्ही अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी गृहमंत्र्यांना येऊन निवेदन देण्याचे निर्देश द्यावेत. आम्ही यावर चर्चा करण्यास तयार आहोत." खर्गे यांनी दिवंगत अरुण जेटली यांच्या मतांचाही संदर्भ दिला, ज्यांनी कामकाजात होणाऱ्या व्यत्ययाला संसदीय लोकशाहीचाच एक भाग असल्याचे म्हटले होते. मात्र आता जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो, तेव्हा ते (सत्ताधारी) त्यापासून पळ काढतात." अशी टीका त्यांनी केली.
खर्गे यांच्या मागणीनंतर, अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, "त्यांच्या (खर्गे) विनंतीचा विचार करा. संसदीय कामकाज मंत्री म्हणून, तुम्ही विरोधकांच्या भावना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू शकता." अध्यक्षांनी हे देखील स्पष्ट केले की निवेदन द्यायचे की नाही, याचा निर्णय शेवटी अमित शहा यांच्यावरच अवलंबून असेल. संसदीय कामकाजात, अध्यक्षांकडून मंत्र्याला दिलेला हा एक महत्त्वाचा संकेत मानला जातो. अध्यक्षांचा व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी लिहिले, "अशी अपेक्षा आहे की, संसदीय कामकाज मंत्री आज दुपारी १२:१६ वाजता राज्यसभा अध्यक्षांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांचे पालन करतील."
मात्र, राज्यसभा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना विरोधी पक्षाच्या भावना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले होते, हा विरोधी पक्षाचा दावा किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्ष असा दावा करत असला तरी अध्यक्षांनी प्रत्यक्षात तसे म्हटलेले नाही, असे ते म्हणाले.
अध्यक्षांच्या निर्देशानुसार कारवाई होण्यापूर्वी रिजिजू आणि खर्गे यांच्यात खडाजंगी झाली. शून्य तासादरम्यान सुरू असलेल्या घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर, रिजिजू यांनी विरोधी पक्षाच्या गदारोळाबाबत नियम २३५(२) आणि २४० चा हवाला दिला. रिजिजू म्हणाले, "दररोज खर्गे तेच तेच वाचून दाखवतात आणि तेच बोलतात; हा नियम आपल्या विरोधी पक्षनेत्यांनाही लागू होतो."
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना रिजिजू यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गृहमंत्री आणि पंतप्रधान सकाळपासून संध्याकाळपर्यंत संसदेत उपस्थित असतात, तरीही विरोधी पक्ष सभागृहाचे कामकाज चालू देत नाही आणि त्याऐवजी बाहेर घोषणाबाजी करण्यात मग्न राहतो. पेपर फुटीची समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, तरीही हे लोक त्याच मुद्द्यावरून सतत गोंधळ घालत आहेत, असे रिजिजू म्हणाले.