Rahul Gandhi Epstein Files Row: लोकसभेत आज पुन्हा एकदा वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला आणि सभागृहात गोंधळ उडाला.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात “एपस्टीन फाइल्स”चा उल्लेख करत सरकारवर गंभीर आरोप केले. “अजूनही लाखो कागदपत्रं बंदिस्त आहेत. पंतप्रधानांच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत आहे. यामागे कारणं आहेत, एक एपस्टीन प्रकरण आणि दुसरं अदानी,” असं ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, "अनिल अंबानी नावाचा एक उद्योगपती आहे. मला विचारायचे आहे की तो तुरुंगात का नाही? कारण त्याचे नाव एपस्टाईन फाइल्समध्ये आहे. मला हरदीप पुरी यांना हे देखील विचारायचे आहे की त्यांची एपस्टीनशी ओळख कोणी करून दिली. मला माहित आहे की त्यांची ओळख कोणी करून दिली आणि हरदीप पुरी यांनाही माहिती आहे." राहुल गांधींनी हे बोलताच सभागृहात गोंधळ उडाला.
त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत टीका केली की, सरकार दबावाखाली असल्याचं दिसतं आहे. राहुल गांधी यांच्या मते, गौतम अदानी हे सामान्य उद्योगपती नसून त्यांच्या कंपन्यांवर अमेरिकेत खटले सुरू आहेत. “या सगळ्याचा परिणाम थेट पंतप्रधानांवर होत आहे,” असा दावा त्यांनी केला. यावर भाजप नेते रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी तथ्यहीन आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
राहुल गांधी यांनी पुढे सरकारवर परराष्ट्र धोरण आणि व्यापार करारांवरूनही टीका केली. “अमेरिका आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकत आहे. शेती क्षेत्र परदेशी कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं, शेतकऱ्यांचा विचारच केला नाही. देश विकताना यांना लाज वाटत नाही का?” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी अमेरिकेच्या टॅरिफमध्ये झालेल्या वाढीचा उल्लेख करत सांगितलं की, भारत सरकारने दबावाखाली निर्णय घेतले आहेत.
राहुल गांधी म्हणाले, “कोणताही भारतीय पंतप्रधान दबावाशिवाय असे करार करत नाही. आज जे काही घडलं आहे, ते फक्त पंतप्रधानांचं नाही तर देशातील 140 कोटी लोकांचं सरेंडर आहे.” यामागे सत्ताधारी पक्षाचं आर्थिक जाळं कारणीभूत असल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, या वक्तव्यांनंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि अध्यक्षांनी वारंवार सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.