Rahul Gandhi Questions Women Reservation Bill: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) या दोन मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सरकारवर जोरदार टीका करत या विधेयकाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, महिला आरक्षणाचं स्वागत असलं तरी त्यामागून परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) कायदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या मते, हा फक्त महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा नसून देशाच्या राजकीय नकाशात बदल करण्याचा प्रयत्न आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सरकार या विधेयकाद्वारे मोठा राजकीय बदल घडवू पाहत आहे, पण त्यामागचा हेतू पारदर्शक नाही. त्यांनी हेही स्पष्ट केलं की विरोधक महिला आरक्षणाच्या विरोधात नाहीत, मात्र परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) वेगळं ठेवणं आवश्यक आहे. हे राष्ट्रविरोधी विधेयक आहे आणि भारताचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी वैयक्तिक अनुभव शेअर करत एक वेगळी बाजूही मांडली.
लहानपणी अंधाराची भीती कशी वाटायची आणि आजीने त्यावर मात करण्यासाठी दिलेला धडा त्यांनी सांगितला. त्यांनी सांगितलं, भीती ही बाहेरच्या गोष्टींपेक्षा आपल्या मनात तयार होते, आणि त्या भीतीला सामोरं जाणं आवश्यक असतं.
या भाषणात राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींचा उल्लेख करत हलक्या फुलक्या शैलीत म्हटलं की,
“मी 20 वर्षांत जे करू शकलो नाही, ते प्रियंकाने 5 मिनिटांत करून दाखवलं.” यावर सभागृहात हास्याचं वातावरण निर्माण झालं.
विरोधी पक्षांनी एकमताने भूमिका घेतली की, महिला आरक्षणाला समर्थन आहे पण परिसीमन त्याच्यासोबत जोडणं योग्य नाही. यामुळे हा मुद्दा पुढील काही दिवस अधिक तापण्याची शक्यता आहे.
महिला आरक्षण आणि परिसीमन या दोन मोठ्या मुद्द्यांभोवती राजकीय संघर्ष तीव्र होताना दिसतोय. सरकार याला ऐतिहासिक पाऊल म्हणत आहे. तर विरोधक यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत आहेत, आगामी चर्चेत या विधेयकाचं भवितव्य ठरणार आहे.