Devendra Fadnavis slams Rahul Gandhi
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी केलेल्या आवाहनावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांची समज कमी आहे. देशातील जनता आणि सर्व राज्ये त्यांना नाकारत आहेत. राहुल गांधी हे सगळीकडे 'रिजेक्टेड' आहेत, त्यांना आता कोणीही किंमत देत नाही," अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पुरवठा साखळी आणि अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या विधानाचा राहुल गांधी यांनी समाचार घेतला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना पलटवार केला. ते म्हणाले, "देशातील पुरवठा व्यवस्था सुरळीत राहावी आणि जागतिक संकटांचा परिणाम भारतावर होऊ नये, यासाठी पंतप्रधानांनी देशाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, राहुल गांधी यांना परिस्थितीचे गांभीर्य समजत नाही. त्यांची समज कमी असल्यानेच ते अशा प्रकारची विधाने करत आहेत."
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती उत्तम असल्याचे सांगताना फडणवीसांनी शेजारील देशाचे उदाहरण दिले. ते म्हणाले कीण "आज पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. जगाच्या पाठीवर सध्या जी आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे, त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केले आहे."
"राहुल गांधी कितीही टीका करत असले तरी, देशातील नागरिक पंतप्रधानांच्या आवाहनाला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देतात. यावेळीही जनता देशहितासाठी सरकारच्या पाठीशी उभी राहील," असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
रविवारी तेलंगणातील सिकंदराबाद येथे एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले की, पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशहितासाठी आपल्याला ठरवावे लागेल की, वर्षभर घरात कोणताही कार्यक्रम असला तरी आपण सोन्याचे दागिने खरेदी करणार नाही." यावेळी त्यांनी कोरोना काळातील परिस्थितीचाही संदर्भ दिला होता.