पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा (Haryana Election Results), जम्मू आणि काश्मीरमधील निवडणूक (Jammu Kashmir Election Results 2024) निकालावर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ''जम्मू-काश्मीरच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा विजय आहे. हा लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे.'' असे राहुल गांधी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
''हरियाणातील अनपेक्षित निकालाचे आम्ही विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला देऊ. हरियाणातील सर्व लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.'' असे राहुल गांधी यांनी नमूद केले.
आम्ही अधिकार, सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि सत्यासाठीचा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमचा आवाज बुलंद करत राहू, असेही राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हरियाणातील निकालाचे मूल्यमापन करणार असल्याचे म्हटले आहे. हरियाणाचा निकाल अनपेक्षित आहे. या जनमताचे मूल्यमापन पक्ष करत आहे. आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी बोलून, संपूर्ण माहिती गोळा करून आणि वस्तुस्थिती पडताळून पाहिल्यानंतर पक्षाकडून सविस्तर प्रतिक्रिया दिली जाईल, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ४८ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, हरियाणातील पराभवानंतर आता काँग्रेसकडून याची कारणे शोधली जात आहेत. काँग्रेसने हरियाणातील पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. तसेच अतिआत्मविश्वास आणि अंतर्गत कलहामुळे काँग्रेसला पराभवाच्या गर्तेत नेल्याचे काही काँग्रेस नेत्यांचे मत आहे. राज्यात भाजप सरकार विरोधात वातावरण असल्याचे काँग्रेसने गृहीत धरले होते. दहा वर्षांची सत्ताविरोधी लाट काँग्रेसला सहज विजय मिळवून देईल, या अतिआत्मविश्वासाने काँग्रेस नेत्यांना कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संपर्क साधण्याचीही गरज वाटली नाही.