नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हरियाणातील लोकांनी कमाल केली आहे. काँग्रेसचे पितळच त्यांनी उघडे केले. सत्ता नसेल तर पाण्याशिवाय मासळी तडफडते, तशी गत काँग्रेसची होते. सत्तेसाठी मग देशाला घातक ठरणारे राजकारण करायलाही काँग्रेस मागेपुढे बघत नाही. आम्ही देशातील समाज एकवटण्याचा प्रयत्न करतो. ते जाती-जातींत विष कालवण्याचे काम करतात, असा घणाघात करून देश आता नव्या वाटेवरून निघालेला आहे. काँग्रेसच्या देशविघातक राजकारणाला तो फशी पडणार नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
हरियाणाच्या निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. हरियाणा ही कुरुक्षेत्राची भूमी आहे. भगवत्गीतेची भूमी आहे. या भूमीवर सत्याचा त्रिवार विजय झालेला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. जम्मू - काश्मीरमध्ये दशकानुदशकांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदा शांततापूर्ण निवडणुका झाल्या. हा भारतीय संविधानाचा विजय आहे. भारताच्या लोकशाहीचा विजय आहे. नवरात्रीचा आज सहावा दिवस आहे. कात्यायनी मातेच्या उपासनेचा हा दिवस आहे. आई कात्यायनी सिंहावर स्वार होऊन, हातात कमळ घेऊन आज आम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिवशी हरियाणात तिसर्यांदा कमळ फुलले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला हरियाणातील विजयाचे श्रेय असल्याचे सांगितले. हरियाणात भाजपचे सरकार स्थापन होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. पंतप्रधान मोदींच्या सेवाकार्याचे हे फलित आहे, असे नड्डा म्हणाले.
भारतामध्ये फूट पाडण्याचा आंतरराष्ट्रीय कट शिजतो आहे. अशा परिस्थितीत आम्ही अधिक एकजूट व्हायला हवे.
काँग्रेस हा परजीवी पक्ष. घटक पक्षांना संपवून टाकतो.
भाजपसाठी राष्ट्र आणि जनकल्याणहेच सर्वतोपरी आहे.
तिसरी महाशक्ती होण्याच्या संकल्पाला निकालाने बळ.
370 हटवल्याने काश्मीर जळाले नाही, उलट सुगंधित झाले.
काश्मीरमध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकारले.
हरियाणाच्या विजयाचा निनाद दूरदूरवर जाईल, प्रेरणा देईल.