Police Wife FIR Husband Dowery Case: पायल राणी या महिला सब इन्स्पेक्टर यांनी आपला पती गुलशन आणि त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांविरूद्ध हुंड्यावरून छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी FIR दाखल केली आहे. पायल राणी यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाल्यानंतर सासरकडच्या लोकांनी १० लाख रूपये आणि गाडीची मागणी करत शारीरिक आणि मानसिक छळ केला.
पती आणि सासू सासऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर अॅसीड फेकण्याची देखील धमकी दिली होती. दुसरीकडं आरोपी पतीने दावा केला आहे की त्यानं कष्टानं पत्नीला शिकवलं आणि पोलीस बनवलं. आता लग्नानंतर दोन वर्षांनी खोट्या केसमध्ये त्याला अडकवलं जात आहे.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये पोस्टिंग असलेल्या पायल राणी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिच्या माहेरकडच्यांनी लग्नात त्यांच्या कुवतीप्रमाणं हुंडा दिला होता. तरीसुद्धा पती गुलशन आणि सासरकडच्या लोकांचे समाधान झाले नाही. अजून हुंड्यासाठी या लोकांनी पायल राणी यांना मारहाण केल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.
पायल यांच्या म्हणण्यानुसार सासरच्या मंडळींनी त्यांच्यावर अॅसीड हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे पायल या त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. आता पोलिसांनी पायल यांच्या मारहाण, धमकी आणि हुंड्यासाठी छळ या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.
पायल राणी यांनी हुंड्यावरून छळ झाल्याचा आरोप केला असला तरी पती गुलशन यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावत थेट एसपींकडेच न्यायासाठी धाव घेतली आहे. गुलशन यांनी सांगितलं की पायल राणी त्यांच्या परिचय हा २०१६ पासूनचा आहे. ते एकमेकांना ओळखत होते. २०२१ मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर २०२२ मध्ये समाजाच्या रिती रिवाजाप्रमाणं त्यांचं लग्न लावण्यात आलं.
दरम्यान, गुलशनने दावा केला की त्यानं कष्ट करून पायलला शिकवलं. त्यानंतर तिला सब इन्स्पेक्टर होण्यास देखील मदत केली. पतीचा आरोप आहे की पद मिळाल्यानंतर आता पत्नीने त्यांच्यावरच आणि निर्दोष कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.
हापुडचे एसपी कुवंग ज्ञानंजय सिंह यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. पोलीस दोन्हीकडच्यांची बाजू ऐकून घेऊन त्याची नोंद करत आहे. पुरावे गोळा केले जात आहेत.
एसपींनी पती गुलशन यांची देखील बाजू ऐकून घेतली जाईल. संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास केला जाईल. तपासानंतरच पुढची कारवाई केली जाईल असं सांगितलं. सध्याच्या घडीला पायल राणी आणि गुलशन यांचे हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. आता काय खरं काय खोटं कोणाचा दावा खरा हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.