पंतप्रधान मोदींनी'रेमल' चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ईशान्येकडील राज्यांमध्ये चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून 'रेमल' चक्रीवादळामुळे आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३६ पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दोन लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमुख अधिकाऱ्यांसह पंतप्रधानांनी चक्रीवादळानंतरची परिस्थिती आणि देशात असलेल्या उष्णतेच्या लाटेसंदर्भात आढावा बैठक घेतली.
'रेमल' चक्रीवादळामुळे सततचा पाऊस आणि भूस्खलनामुळे ईशान्येकडील काही भाग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक पुराच्या पाण्याखाली बुडाले आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वेने मंगळवारपासून दक्षिण आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि मिझोरामला जाणाऱ्या एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि मालगाड्याही रद्द केल्या आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आढावा बैठक घेतली. देशात विविध राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे, याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 'रेमल' चक्रीवादळानंतर नैसर्गिक आपत्तींदरम्यान ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले होते आणि सर्व शक्य सहकार्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अधिकारी प्रभावित झालेल्या लोकांना आणि भागांना मदत करण्यासाठी अधिकारी जमिनीवर काम करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळामुळे मोठा भाग प्रभावित झाला आहे. नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. जी लोक या परिस्थितीमुळे प्रभावित झाली, त्या सर्वांसोबत माझ्या प्रार्थना आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकारने राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आणि प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी अधिकारी सतत काम करत आहेत." असेही ते म्हणाले.
पुढील सरकारच्या १०० दिवसांचा कार्यक्रमासाठी बैठक?
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल, असे संकेत जवळजवळ सर्व एक्झिट पोल्सने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यसूचीचा आढावा घेण्यासाठी विचारमंथन सत्रासह विविध विषयांवर जवळपास ७ बैठका घेणार आहेत. यात जागतिक पर्यावरण दिन (५ जून) मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते बैठक घेणार आहेत. एक्झिट पोलने भाजपला मोठ्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर नवीन सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा अजेंडा काय असेल याचा आढावा घेण्यासाठीही एक विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.