PM Narendra Modi:
नवी दिल्ली: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत संयमाने करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिला असून स्वतःच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या 'विशेष सुरक्षा दलाला' ताफ्यातील गाड्या कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, ही कपात करताना कोणत्याही प्रकारे सुरक्षा नियमावलीशी तडजोड केली जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. एसपीजीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, नवीन गाड्यांची खरेदी न करता उपलब्ध संसाधनांतूनच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे.
पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनीही इंधन बचतीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे, आपल्या अधिकृत ताफ्यातील गाड्या कमी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनीही आपल्या ताफ्यातील 'एस्कॉर्ट' गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी तेलंगणामधील हैदराबाद येथे झालेल्या रॅलीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला आर्थिक लढाईत साथ देण्याचे आवाहन केले. "आज पेट्रोल, गॅस आणि डिझेल यांसारख्या गोष्टींचा अत्यंत संयमाने वापर करणे ही काळाची गरज आहे. आपल्याला आयात केलेली पेट्रोलियम उत्पादने केवळ आवश्यकतेनुसारच वापरावी लागतील. ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. कारपूलिंग करावे. देशात आज वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाच्या प्रतिकूल परिणामांची तीव्रताही कमी होईल," असे मोदी म्हणाले.