Passport Citizenship Row: केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असं स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. काही जणांनी पासपोर्ट हा फक्त भारतीय नागरिकांनाच दिला जातो असं निदर्शनास आणून दिलं तर काहींनी भाजप आणि एनडीएवर टीका केली.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर गुरूवारी राज्य सभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जर पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही तर मग कोणती कागदपत्रे नागरिकत्वाचा पुरावा आहेत असा सवाल केला.
कपिल सिब्बल आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहितात, 'केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने २४ जून रोजी पासपोर्ट हा प्रवासी कागद आहे तो काही नागरिकत्वाचा पुरावा किंवा कागदपत्र नाहीये असं सांगितलं. मग नागरिकत्वाचा पुरावा कोणता.'
तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी देखील भाजपला चिंमटा काढताना म्हटलं की, 'असं दिसतंय की आजच्या घडीला भारतीय नागरिकत्वाचा पुरावा हा हिंदू आणि भाजप मतदार असणं हे दोन्ही असावेत. दुसरं काही चालणार नाही.'
पासपोर्ट विषयाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, मग पासपोर्ट देताना पोलीस कोणती कागदपत्रे पडताळतात. ते काय भारतीय नसणाऱ्या लोकांना पासपोर्ट देतात का असा प्रश्न विचारला.
आदित्य ठाकरे आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहितात, 'जर परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय की पासोपर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाही तर
१ - मग पोलीस पासपोर्ट देताना काय व्हेरिफाय करतात?
२- आपला देश भारतीय नसणाऱ्या लोकांना हे ट्रायव्हल डॉक्युमेंट देते का?
आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितात की, परराष्ट्र मंत्रालयाचे स्टेटमेंट हे इतर देशांच्या मनात शंका निर्माण करणार आहे. भारत भारतीय नागरिक नसणाऱ्यांना प्रवासी कागद म्हणून भारतीय पासपोर्ट देतो का? गोधळलेल्या परराष्ट्र धोरणाच्या पुढं जात आता परराष्ट्र मंत्रालय अजून किती मूर्खपणा करणार आहे?'
राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी 'आता निवडणूक आयोगाचे बूथ लेवल ऑफिसर माझ्या नागरिकत्वावर शंका घेऊ शकतो आणि मला मतदान करण्यापासून रोखू शकतो. याचा परिणाम भाजप निवडणूक जिंकणार आता विषय सर्वोच्च न्यायालयाकडे.' असे म्हणत परराष्ट्र मंत्रालयाचे हे वक्तव्य कोणत्या राजकीय फायद्यासाठी असू शकतं याकडे लक्ष वेधलं.