पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरुणांनी बुधवारी (दि. 13) घुसखोरी करुन घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. या तरुणांवर संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach ) संसदेच्या सुरक्षेचा भंग, अतिक्रमण, सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संसदेत घुसरखोरी केल्याप्रकरणी चौघांवर संसदेच्या सुरक्षेचा भंग कलम 120-बी (गुन्हेगारी कट), 452 (अतिक्रमण), कलम 153 (फक्त दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), 186 (सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे), 353 (हल्ला किंवा फौजदारी बळजबरी) अंतर्गत गुन्हा ) सार्वजनिक सेवकांना त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी) आयपीसी आणि UAPA च्या 16 आणि 18 कलमांची पार्लमेंट स्ट्रीट पीएस येथे नोंदणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तपासासाठी हे प्रकरण विशेष कक्षाकडे वर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील विकी आणि त्याच्या पत्नीची चौकशी सुरू आहे.
संसद अधिवेशनादरम्यान तरुणांनी बुधवारी (दि.13) लोकसभेत घुसखोरी करून 'तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,' अशा घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 22 वर्षे पूर्ण होत असताना, नव्या संसद भवनाच्या सुरक्षेला खिंडार पाडणार्या या घटनाक्रमामुळे सरकारसह सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. यामुळे संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे दावे फोल ठरले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक तरुण आणि हरियाणातील एका तरुणीसह पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील एकजण फरारी आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती.
केंद्रीय गृह मंत्रालयानेही संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून हे आदेश देण्यात आले आहेत. अनिश दयाळ सिंग, DG, CRPF यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत," गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेतील उल्लंघनाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. समिती लवकरात लवकर संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह शिफारशींसह आपला अहवाल सादर करेल," असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा