pakistan capital islamabad distance from india border
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचे बळी गेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. तेंव्हापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू झाला आहे. पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. चला तर जाणून घेवूयात भारताच्या सीमेपासून ही शहरे किती लांब आहेत.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद भारतीय सीमेपासून किती अंतरावर आहे माहिती आहे का? इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे संसद भवन, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालय आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे हद्य समजल्या जाणाऱ्या इस्लामाबादवर हल्ला करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. इस्लामाबाद वाघा-आटारी सीमेपासून २५० किलोमीटर आणि काश्मीर पासून जवळपास २०० किलो मीटर अंतरावर आहे.
कराची ही सिंध प्रांताची राजधानी आहे. कराची शहर भारतीय सीमेपासून जवळपास ३५० किमी अंतरावर आहे. सियालकोट दिल्ली पासून ५१३ किलोमीटर, अमृतसरहून १०० किलोमीटर आणि जम्मूपासून फक्त ४७ किमी अंतरावर आहे. सियालकोट हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. पेशावर वाघा-अटारी बॉर्डरपासून ३४० किमी आणि जम्मू-काश्मीरहून १५० किलोमीटर अंतरावर आहे. या शिवाय रावळपिंडी एलओसी पासून १२० किमी आणि वाघा-अटारी बॉर्डरपासून २५० किलोमीटर अंतरावर आहे. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आहे.
पाकिस्तानच्या या शहरांचे अंतर भारतीय सीमेपासून कितीही दूर असले, तरी भारतीय सैन्य पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी फिरविण्यासाठी हे अंतरही पार करून आपली ताकद दाखवत आहे. तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला असून, भारताच्या या जोरदार प्रत्युत्तराने पाकिस्तान हादरून गेला आहे.