Sansad Ratna Award 2025 Maharashtra MP List
नवी दिल्ली : संसदेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशातील १५ खासदारांना संसदरत्न पुरस्कार देऊन शनिवारी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तृहरी महताब, एन.के. प्रेमचंद्रन या खासदारांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर महाराष्ट्रातील खासदार अरविंद सावंत, स्मिता वाघ, वर्षा गायकवाड, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एका एनजीओकडून हे पुरस्कार दिले जातात. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांना देखील पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, पुरस्कार वितरण सोहळ्याला ते दोघेही उपस्थित नव्हते. अलीकडील भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेले खासदार निशिकांत दुबे यांच्या गैरहजेरीची चर्चा महाराष्ट्र सदनात होती.
खासदार भर्तृहरी महताब (भाजप) अध्यक्ष असलेल्या वित्त स्थायी समितीचा आणि चरणजित सिंग चन्नी (काँग्रेस) अध्यक्ष असलेल्या कृषी स्थायी समितीचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
१) स्मिता वाघ (भाजप)
२) अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
३) नरेश गणपत म्हस्के (शिवसेना)
४) वर्षा गायकवाड (काँग्रेस)
५) मेधा कुलकर्णी (भाजप)
६) प्रवीण पटेल (भाजप)
७) रवी किशन (भाजप)
८) निशिकांत दुबे (भाजप)
९) विद्युत बरन महतो (भाजप)
१०) पी. पी. चौधरी (भाजप)
११) मदन राठोड (भाजप)
१२) सी.एन. अन्नादुराई (द्रमुक)
१३) दिलीप सैकिया (भाजप)
कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेतील गदारोळावर खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या संसदेत गोंधळ घालणारे खासदार बातम्यांमध्ये येतात आणि जे चांगले भाषण देतात त्यांची चर्चा होत नाही. २००६- २००७ मध्ये शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते. सभागृहात शेतीवर चर्चा झाली होती. त्यांचे कृषी धोरण इतके चांगले होते. त्यावेळी अनेक खासदार चांगले बोलले. मात्र, दुसऱ्या दिवशी कोणत्याही वर्तमानपत्राने शरद पवारांचे नाव प्रकाशित केले नाही. मग जेव्हा ते वृत्तांकन केले जात नाही किंवा लोकांना ते आवडत नाही तेव्हा तुम्ही चांगले काम कसे करू शकता? असा सवाल रिजेजू यांनी केला. चांगले भाषण देऊन आणि चांगले काम करून, मतदारसंघातील लोकांना त्याबद्दल माहिती नसते, जनता ते ऐकत नाही किंवा ते बातम्यांमध्ये येत नाही,असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
पुरस्कार कार्यक्रमाचे बॅनर महाराष्ट्र सदनातील महापुरूषांच्या पुतळ्यासमोर लावल्याने वाद निर्माण झाला. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर बॅनर लावल्यामुळं महाराष्ट्र सदनातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी आयोजकाना विचारले असत. सुरक्षा अधिकाऱ्यांना संबंधित आयोजकांकडून आवाज वाढवून अरेरावी करण्यात आली. यामुळे काही काळ वातावरण तापले होते. महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे उपस्थित मराठी लोकांनी आयोजकांनी सुनावले.