Noida Violence Pakistan Connection
नोएडा : नोएडामध्ये सोमवारी कामगार आंदोलनास हिंसक वळण लागले. हा हिंसाचार एक सुनियोजित कटाचा भाग असून, या भागात अलीकडेच झालेल्या दहशतवादाशी संबंधित अटकेच्या पार्श्वभूमीवरपाकिस्तानच्या संभाव्य संबंधाचीही चौकशी करत येत असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ३५० जणांना अटक केली आहे.
मंत्र्यांचे हे विधान मेरठ आणि नोएडामधून चार संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर काही दिवसांनी आले आहे, ज्यांचे संबंध पाकिस्तानस्थित हँडलर्सशी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नोएडामधील हिंसाचार हा मुजफ्फरनगरमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रम विस्कळीत करण्याच्या उद्देशाने असू शकते, असा दावाही राजभर यांनी केला आहे.
देशविरोधी शक्तींच्या भूमिकेचा आरोप करत अनिल राजभर म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अस्वस्थ झालेल्या शक्ती अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचत आहेत. कामगारांनी अफवा किंवा चिथावणीला बळी पडू नये. त्यांनी शांतता राखावी. अराजकता आणि आक्रमक निदर्शने हे कोणत्याही समस्येचे समाधान नाहीत.”
गौतमबुद्ध नगरचे पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी सोमवारी सांगितले की, नोएडामधील कामगारांच्या आंदोलनात केवळ दोन ठिकाणी हिंसक निदर्शने झाल्यामुळे बळाचा वापर करण्यात आला. पोलीस आयुक्त सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, “आज नोएडामध्ये ८३ ठिकाणी सुमारे ४२ हजार कामगार आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. दोन ठिकाणी आंदोलनास हिंसक वळण लागले. उर्वरित ठिकाणी संयम बाळगत चर्चा करण्यात आली आणि चर्चेनंतर काही कामगार परत गेले. मात्र कामगार निघून गेल्यानंतर सीमावर्ती जिल्ह्यांमधून काही लोक समूहाने आले आणि त्यांनी वातावरण चिथावणीखोर आणि हिंसक बनवण्याचा प्रयत्न केला. सिंह म्हणाल्या की, या समूहातील काही लोक आमच्या ताब्यात आले आहेत आणि काहींची सीसीटीव्हीद्वारे ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.”