पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाचा आज ७ वा दिवस आहे. संसद अधिवेशनात NEET-UG पेपफुटीवरून संसदेत पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर देखील विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी NEET परिक्षाप्रश्नी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, "प्रिय पंतप्रधान,मी बुधवार दि.३ जुलै रोजी NEET वर संसदेत चर्चेची विनंती करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. आमचे उद्दिष्ट २४ लाख NEET उमेदवारांच्या हितासाठी त्यांच्या उत्तरेस पात्र ठरणे आहे. मला विश्वास आहे की, तुम्ही या चर्चेचे नेतृत्व करत असाल तर ते योग्य ठरेल".
लाखो कुटुंबांनी आपल्या मुलांना आधार देण्यासाठी प्रचंड वैयक्तिक त्याग केला आहे. अनेकांसाठी पेपर फुटणे म्हणजे आयुष्यभराच्या स्वप्नाचा विश्वासघात आहे. आज हे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय आमच्याकडे, त्यांच्या लोकप्रतिनिधींकडे या समस्येचे निराकरण करण्यासाठी धाडसी आणि निर्णायक पावले उचलण्याची अपेक्षा करत आहेत.
गेल्या सात वर्षांत 70 हून अधिक पेपर फुटले आहेत, ज्याचा परिणाम 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. इतर परीक्षा पुढे ढकलण्याची आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांची बदली करण्याचे सरकारचे पाऊल म्हणजे केंद्रीकृत चाचणी प्रणालीतील बिघाड झाकण्यासाठी चाललेली चाल आहे, असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी पत्रातून केला आहे.