Captain Anshuman Singh Wife
कॅप्टन अंशुमन यांना देण्यात आलेला मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार त्यांच्या पत्नी आणि आईने स्वीकारला होता.  file photo
राष्ट्रीय

कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील टिप्पणी; 'NCW'कडून गंभीर दखल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सियाचीनमध्ये शहीद झालेले कॅप्टन अंशुमन सिंग यांची पत्नी स्मृती यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणे एका यूजरला महागात पडले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबरोबरच कठोर कारवाई करण्यास दिल्ली पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपी हा दिल्लीचा रहिवासी आहे.

सियाचीन ग्लेशियरमध्ये १९ जुलै २०२३ रोजी भारतीय सैन्याच्या अनेक तंबूंना आग लागली होती. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर कॅप्टन अंशुमन सिंग शहीद झाले. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे राहणारे अंशुमन सिंह यांचे अपघाताच्या ५ महिने आधी म्हणजेच १० फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न झाले होते. या घटनेच्या १५ दिवस आधी अंशुमन सियाचीनला गेले होते. कॅप्टन अंशुमन हे यूपीच्या देवरिया जिल्ह्यातील बर्दिहा दलपत गावचे होते, तर त्यांची पत्नी पठाणकोटची रहिवासी आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांची भेट झाली होती. कॅप्टन अंशुमन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी आणि आईने हा सन्मान स्वीकारला, यावेळचे व्हिडिओ मीडियात दाखवण्यात आले. यावर सोशल मीडियावर एका युजरने अश्लील टिप्पणी केली होती.

'बीएनएस'मध्ये तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद

राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी दिल्ली पोलिसांना दिलेल्या पत्रात विशेष कायदेशीर तरतुदींचाही उल्लेख केला आहे. यामध्ये भारतीय न्यायिक संहिता (BNS) चे कलम ७९ आणि माहिती आणि तंत्रज्ञान (IT) कायदा, २००० चे कलम ६७ यांचा समावेश आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या (BNS) कलमामध्ये स्त्रीच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याच्या हेतूने केलेल्या कोणत्याही कृत्यास शिक्षा देण्याची तरतूद आहे. आयटी कायद्याचे हे कलम इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षेशी संबंधित आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने आपल्या पत्रात या कायद्यांतर्गत दिलेल्या शिक्षेचा उल्लेख करताना म्हटले आहे की, या गुन्ह्यांसाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि प्रथमच गुन्हा करणाऱ्यांना दंडाची तरतूद आहे.

तीन दिवसात कारवाई करण्याचे आदेश

एनसीडब्ल्यूने दिल्ली पोलिसांना आरोपी विरूद्ध तात्काळ एफआयआर नोंदवून अटक करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून निःपक्षपाती तपास करण्याची मागणीही आयोगाने केली आहे. याशिवाय कारवाईचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे.

SCROLL FOR NEXT