पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील बारमेरमध्ये सोमवारी (दि.2) रात्री मोठा विमान अपघात झाला. या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-२९ कोसळले. हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळताच नागाणा पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. यावेळी लढाऊ विमानामध्ये मोठी आग लागल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून विमानाला लागलेली आग विझवली. या दुर्घटनेत पायलट सुरक्षित असल्याचे हवाई दलाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. मिग-२९ हे लढाऊ विमान शेतात कोसळल्याने घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांची गर्दी पाहून पोलिसांनी फायटर प्लेनला चारही बाजूंनी घेराव घातला असून कोणालाही घटनास्थळी जाऊ दिले जात नाही.(MIG 29 Crash Rajasthan)
या प्रकरणी भारतीय हवाई दलाने 'X' वर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "बाडमेर सेक्टरमध्ये रात्रीच्या नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हवाई दलाच्या मिग-29 लढाऊ विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटला बाहेर काढावे लागले. विमानातून पायलट सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.”(MIG 29 Crash Rajasthan)
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले असून, या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे. अपघातानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निश्चितच होते, मात्र वैमानिकाच्या शहाणपणामुळे मोठी दुर्घटना टळली असून कोणीही जखमी झाले नाही. या घटनेने पुन्हा एकदा हवाई दलाची तत्परता आणि वैमानिकांच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला आहे, ज्यामुळे अशा अपघातांमध्ये होणारी जीवित आणि वित्तहानी टाळता येते.