West Bengal election 2026
कोलकाता: विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. पश्चिम बंगालच्या पोलीस दल आणि प्रशासकीय नेतृत्वात मोठा फेरबदल करण्यात आला असून, निवडणूक आयोगाने विद्यमान पोलीस महासंचालक (DGP) आणि मुख्य सचिवांना पदावरून हटवून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.वरिष्ठ अधिकारी दुष्यंत नारियाला हे नंदिनी चक्रवर्ती यांच्या जागी नवीन 'मुख्य सचिव' म्हणून कार्यभार स्वीकारतील, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी सिद्ध नाथ गुप्ता यांची पीयूष पांडे यांच्या जागी 'पोलीस महासंचालक' (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सिद्ध नाथ गुप्ता यांची पश्चिम बंगालचे प्रभारी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, १९९१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी नटराजन रमेश बाबू यांची सुधार सेवा महासंचालक म्हणून, तर १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजय मुकुंद रानडे यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (ADG & IGP - कायदा आणि सुव्यवस्था) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. यासोबतच, कोलकाता पोलीस आयुक्तपदी १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजय कुमार नंद यांची नियुक्ती झाली आहे.
निवडणूक आयोगाने हे आदेश तात्काळ लागू करण्यास सांगितले असून, नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी रुजू झाल्याचा अहवाल १६ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे, त्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुकीशी संबंधित कोणतेही पद दिले जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतरच हे बदल करण्यात आले आहेत.
प्रशासकीय पातळीवरही मोठे बदल
पोलीस दलासोबतच निवडणूक आयोगाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. संघमित्रा घोष यांची गृह आणि पर्वतीय व्यवहार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती. त्यांनी २००४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी जगदीश प्रसाद मीना यांची जागा घेतली आहे. या सर्व बदल्यांची अंमलबजावणी सोमवार, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, पश्चिम बंगालमध्ये केवळ दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. राज्यात २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल, तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.