File Photo 
राष्ट्रीय

Supreme Court : बँकेसोबत ‘वन-टाईम सेटलमेंट’म्हणजे कर्ज घोटाळा प्रकरण रद्द करण्याचा आधार नाही : सर्वोच्च न्यायालय

आर्थिक गुन्‍ह्यांचा परिणाम व्‍यापक सार्वजनिक हितावर होतो

पुढारी वृत्तसेवा

  • NPA प्रकरणांमध्ये बँक पुनर्प्राप्तीसाठी दबावाखाली कमी रकमेवर तडजोड करावी लागते

  • आर्थिक गुन्हे हे खाजगी वाद नसतात; समाजाचा मोठा तोटा होतो

  • उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन कायदेशीरदृष्ट्या चुकीचा

Supreme Court on Loan Fraud Case

नवी दिल्ली : वन-टाईम सेटलमेंट (OTS) झाल्यामुळे आर्थिक घोटाळा गुन्हा रद्द होऊ शकत नाही. आर्थिक गुन्हे बँकेला झालेल्या तात्काळ आर्थिक नुकसानापेक्षाही सार्वजनिक हिताला कमकुवत करतात, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने सुमारे ५२.५ कोटी रुपयांच्‍या कर्ज घोटाळा प्रकरणी मेसर्स सर्वोदय हायवेज लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध फौजदारी कारवाई पुन्हा सुरू करण्याचे आदेश देत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा 2022 मधील आदेश रद्द केला.

‘वन-टाईम सेटलमेंट’नंतर उच्च न्यायालयाने रद्द केले होते प्रकरण

'लाईव्‍ह लॉ'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरला (आताची एसबीआय) ५२.५ कोटी रुपये कर्ज घोटाळा प्रकरणी सीबीआयने तपास केला. मेसर्स सर्वोदय हायवेज लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध आर्थिक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या 'एफआयआर'मध्‍ये बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचा आरोप होता. बँकेच्या अंतर्गत चौकशीत हे खाते NPA घोषित केले गेले आणि रु. ५२.५ कोटींच्या फसवणुकीचा अंदाज वर्तवला गेला. चौकशीनंतर CBI ने कंपनी, तिच्या संचालकांसह त्यावेळच्या शाखा व्यवस्थापकावरही IPC आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले. बँक अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगीही मिळालेली होती. २०२२ मध्‍ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने वन-टाईम सेटलमेंट (एकरकमी तडजोड) केल्याने हा खटला रद्द केला होता. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आर्थिक गुन्हे खासगी वाद नसतात; समाजाचा मोठा तोटा होतो

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सीबीआयच्‍या अपीलावर सुनावणी झाली. खंडपीठाने नमूद केले की, वन-टाईम सेटलमेंट रक्कम प्रत्यक्ष देणेपेक्षा खूप कमी होती आणि NPA प्रकरणांमध्ये बँक पुनर्प्राप्तीसाठी दबावाखाली कमी रकमेवर तडजोड करावी लागते. या प्रकरणी IPC कलम 120B (कटकारस्थान), 406 (विश्वासघात), 420 (फसवणूक), 467, 468, 471 (खोटी कागदपत्रे, बनावटपणा) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी लागू केल्या होत्या. आर्थिक गुन्ह्यांमध्ये केवळ बँकेची फसवणूक होत नाही, तर संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम होतो, असे निरीक्षण न्यायालयाने स्पष्ट केले की, वन-टाईम सेटलमेंट म्हणजे पूर्ण वसुली होत नाही. या प्रकरणातही बँकेने ४१ कोटी रुपये मिळवले; पण एकूण देणे ५२ कोटींहून अधिक होती. त्यामुळे अशा सेटलमेंटमुळे फसवणूक, बनावट कागदपत्रे किंवा भ्रष्टाचारासारख्या गुन्ह्यांची जबाबदारी संपुष्टात येत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.

उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन कायदेशीरदृष्ट्या चुकीचा

या प्रकरणी बनावट कागदपत्रे, बँक अधिकाऱ्यांचे संगनमत, भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील तरतुदी आणि वन-टाईम सेटलमेंटनंतर ५ कोटी रुपये देणे आदी बाबींकडे उच्च न्यायालयाचे दुर्लक्ष झाले. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन कायदेशीरदृष्ट्या चुकीचा होता, असे निरीक्षण नोंदवत या खटल्याची सुनावणी मूळ स्वरूपात पुन्हा सुरु करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT