Delhi High Court
नवी दिल्ली: लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्यानंतर, जर कुंडली जुळत नसल्याचे कारण देऊन लग्न करण्यास नकार दिला, तर भारतीय न्याय संहिताच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी एका व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळताना ही टिप्पणी केली. संबंधित व्यक्तीवर एका तरूणीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर कुंडली जुळत नसल्याचे कारण सांगून लग्न नाकारल्याचा आरोप आहे. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, आरोपीने पीडितेला वारंवार आश्वासन दिले होते की त्यांच्या लग्नात कुंडलीसह कोणतीही अडचण येणार नाही. याच आश्वासनाच्या जोरावर दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवण्यात आले. अशा परिस्थितीत, आरोपीचे हे वर्तन कलम ६९ अंतर्गत गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकते.
४ जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने असा युक्तिवाद केला होता की, त्यांचे संबंध परस्पर संमतीने होते आणि ते एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखत होते. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा त्याच्या वकिलांनी केला होता.
मात्र, न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले की, पीडितेने पहिली तक्रार नोव्हेंबर २०२५ मध्येच दिली होती. परंतु, आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर ती तक्रार मागे घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा कुंडलीचे कारण पुढे करून लग्न नाकारण्यात आले, जे कायद्यानुसार चुकीचे ठरते.
भारतीय न्याय संहिताच्या कलम ६९ नुसार फसवणुकीच्या मार्गाने लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा आहे. यामध्ये लग्नाचे खोटे आश्वासन देणे, नोकरी किंवा पदोन्नतीचे खोटे आमिष दाखवणे किंवा स्वतःची ओळख लपवून संबंध ठेवणे यांचा समावेश होतो.