Nipah virus Kerala : केरळमधील कोझिकोड येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीमध्ये एन्सेफलायटीसची (मेंदूज्वर) लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या शरीरातील द्रवाचे नमुने पुण्याच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' (NIV) कडे निपाहच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. हा रुग्ण कोझिकोडमधील फेरोके येथील रहिवासी आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेली या रुग्णाची प्राथमिक निपाह चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज (दि. ११ जून) दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथून बुधवारी उशिरा रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड (विलगीकरण कक्ष) तयार करण्यात आला आहे.दरम्यान, आरोग्य मंत्री के. मुरलीधरन गुरुवारी दुपारी राज्याच्या राजधानीत वैद्यकीय शिक्षण संचालक, आरोग्य सेवा संचालक आणि इतर उच्च अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेणार आहेत.
बुधवारी रात्री तिरुवनंतपुरम येथे माध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, लक्षणांवरून हा संसर्ग 'निपाह' असण्याची दाट शक्यता आहे. "हा रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आला आहे. तो आधी खाजगी रुग्णालयाच्या ओपीडी (OPD) विभागात गेला होता, तिथून त्याचे एमआरआय (MRI) स्कॅनिंग आणि नंतर इकोकार्डियोग्राम (Echocardiogram) चाचणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, संबंधित खाजगी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन (विलगीकरणात) जाण्यास सांगण्यात आले आहे," असे मुरलीधरन यांनी स्पष्ट केले. रुग्णाने एक गोडाऊन भाड्याने घेतले होते आणि त्याने स्वतः त्या जागेची साफसफाई केली होती. तो एक लहान व्यावसायिक आहे. त्या भागात 'फ्रूट बॅट्स' (वटवाघुळे - जे निपाह विषाणूचे नैसर्गिक वाहक आहेत) असण्याची शक्यता आहे. हा रुग्ण एकदा तापातून बरा झाला होता, पण त्याला पुन्हा लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले," अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
केरळमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता आधीच अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या नव्या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.आरोग्य अधिकाऱ्यांनी हा रुग्ण कुठे कुठे गेला होता याचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा माग काढण्यासाठी 'रूट मॅप' (Route Map) तयार केला जात आहे. कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आयसोलेशन वॉर्डच्या परिसरात कडक निर्बंध लागू केले आहेत.यापूर्वी कोझिकोडमध्ये २०१८ आणि २०२३ मध्ये निपाहची साथ पसरली होती, तर २०२१ मध्येही निपाहचे एक प्रकरण समोर आले होते.
निपाह हा एक अत्यंत संसर्गजन्य प्राणिजन्य विषाणू आहे. तो प्राण्यांमधून मानवांमध्ये आणि काही प्रकरणांमध्ये माणसांमधून माणसांमध्ये पसरू शकतो. हा विषाणू सर्वात आधी १९९९ मध्ये मलेशियामध्ये डुकरांशी संबंधित एका साथीच्या आजारादरम्यान आढळला होता. तेव्हापासून, 'टेरोपस' (Pteropus) प्रजातीची फ्रूट बॅट्स (फळे खाणारी वटवाघुळे) ही या विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये याच्या साथीची नोंद झाली आहे. या आजाराचा उच्च मृत्यू दर आणि वेगाने पसरण्याची क्षमता पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निपाह विषाणूला त्वरित संशोधन आणि पूर्वतयारी आवश्यक असलेला 'प्राधान्यक्रमाचा आजार' (Priority Disease) म्हणून वर्गीकृत केले आहे. हा विषाणू प्रामुख्याने श्वसनसंस्था आणि मेंदूवर हल्ला करतो. यामध्ये मृत्यूचा दर तब्बल ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असू शकतो.
निपाह विषाणूची लक्षणे कोणती आहेत?
निपाह संसर्गाची लक्षणे सहसा विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर ३ ते १४ दिवसांच्या आत दिसू लागतात. सुरुवातीची लक्षणे सामान्य विषाणूजन्य आजारांसारखी (Viral fever) असू शकतात, ज्यामुळे त्याचे निदान करणे कठीण होते.
प्रमुख लक्षणे:
तीव्र ताप आणि डोकेदुखी
खोकला आणि घसा खवखवणे
स्नायू दुखणे आणि उलट्या होणे
चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे
संभ्रमावस्था किंवा अस्वस्थता जाणवणे
गंभीर प्रकरणांमध्ये, या संसर्गाचे रूपांतर 'एन्सेफलायटीस'मध्ये (मेंदूला सूज येणे) होऊ शकते, ज्यामुळे झटके येणे, कोमात जाणे आणि संभाव्य मृत्यू होऊ शकतो.
निपाह विषाणू एकापेक्षा जास्त मार्गांनी पसरू शकत असल्यामुळे तो अधिक चिंताजनक मानला जातो.
प्राण्यांकडून मानवांमध्ये होणारा प्रसार: फ्रूट बॅट्स (वटवाघुळे) हे या विषाणूचे मुख्य वाहक आहेत. बाधित वटवाघुळे, त्यांची लाळ, मूत्र किंवा विष्ठेच्या थेट संपर्कात आल्याने मानवाला संसर्ग होऊ शकतो.
बाधित डुकरे, शेळ्या किंवा घोड्यांच्या संपर्कात आल्यानेही हा आजार पसरू शकतो.वटवाघुळांनी चावा घेतलेली फळे, ताजी फळांची रसे किंवा खजुराचा रस पिण्यामुळे निपाहची साथ पसरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षांनी किंवा वटवाघुळांनी चावा घेतलेली फळे खाणे टाळावे.
माणसाकडून माणसाला होणारा प्रसार: बाधित व्यक्तीच्या लाळ, रक्त किंवा श्वसनाच्या थेंबांच्या (Respiratory droplets) जवळच्या संपर्कात आल्यास हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. हा प्रसार प्रामुख्याने रुग्णाची काळजी घेणारे कुटुंबीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये जास्त दिसून येतो. मात्र, निपाह हा इन्फ्लूएंझा किंवा कोविड-१९ इतक्या वेगाने आणि सहज पसरत नाही.
तज्ज्ञांच्या मते, सामान्य संपर्कामुळे निपाह विषाणू वेगाने पसरत नाही. मानवाकडून मानवामध्ये होणारा बहुतांश प्रसार हा रुग्णालयात किंवा घरात बाधित व्यक्तीच्या दीर्घकाळ आणि अत्यंत जवळून संपर्कात आल्यामुळेच होतो.असे असले तरी, या आजारातील मृत्यूचा उच्च दर पाहता, आरोग्य यंत्रणा अगदी मर्यादित प्रसारालाही गांभीर्याने घेतात. संसर्गाची साथ रोखण्यासाठी रुग्णाला त्वरित विलग करणे (Isolation), संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे आणि संसर्ग-नियंत्रणाचे कडक नियम पाळणे आवश्यक असते.
सध्या निपाह विषाणूवर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे 'प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय' आहे. आरोग्य तज्ज्ञांनी खालील खबरदारी घ्यावी...
वटवाघुळे आणि आजारी प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळावे.
वटवाघुळांनी अर्धवट खाल्लेली फळे खाऊ नयेत.
फळे खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.
नियमितपणे हात धुण्याची सवय ठेवावी
क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यास आणि लक्षणे दिसू लागल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.