Karnataka crime news
यादगीर : आईच्या अधिक जवळची आणि नेहमी तिचीच बाजू घेत असल्याचा राग मनात धरून वडिलांनी आपल्या दोन मुलांना कालव्यात ढकलल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात घडली. या घटनेत नऊ वर्षांच्या मुलीचा आणि अडीच वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी वडील शांतप्पा याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी चौथी इयत्तेत शिकत होती, तर तिचा लहान भाऊ अडीच वर्षांचा होता. बिगुडी परिसरातील सिंचन कालव्यात दोघांना ढकलण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत मुलाचा मृतदेह दुपारी साडेतीनच्या सुमारास, तर मुलीचा मृतदेह सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान सापडला. यादगीरचे पोलीस अधीक्षक पृथ्विक शंकर यांनी सांगितले की, शांतप्पाने स्वतः पोलिसांच्या ११२ आपत्कालीन क्रमांकावर फोन करून दोन मुलांना कालव्यात ढकलल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शांतप्पा दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास आपल्या तिन्ही मुलांना मोटारसायकलवरून बिगुडी येथील कालव्याजवळ घेऊन गेला होता. तेथे त्याने नऊ वर्षांच्या मुलीला आणि अडीच वर्षांच्या मुलाला पाण्यात ढकलले. त्याने सहा वर्षांच्या मुलीला मात्र सोबत घेतले आणि यादगीर शहरात परतला. ही मुलगी पहिलीत शिकते. यादगीरला पोहोचल्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून दोन मुलांना कालव्यात फेकल्याचे सांगितले.
रात्री उशीर झाल्याने पोलिसांना तातडीने शोधमोहीम सुरू करता आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. तसेच कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबविण्याच्या सूचना कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
चौकशीदरम्यान शांतप्पाने पोलिसांना सांगितले की, दोन्ही मुले त्यांची आई रेणुका हिच्या अधिक जवळची होती आणि त्यांचे त्याच्याशी पटत नव्हते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शांतप्पाला ताब्यात घेतले आहे.