नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
कथित मुडा घोटाळ्यात कर्नाटकच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर राजकारण तापले आहे. केंद्र सरकार कर्नाटकातील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे. तर भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कथित मुडा घोटाळा प्रकरणावर भाजपच्या नेत्यांनी मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला.
भाजप नेते आणि खासदार संबित पात्रा यांनी कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेते सरकार आणि संविधानाचा अपमान करत आहेत. हे पश्चिम बंगाल आणि कर्नाटकात पाहायला मिळत आहे.
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, कर्नाटकचे काँग्रेस सरकार कदाचित या देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. लूट करणे आणि खोटे बोलने हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाची लूट केली जात असल्याचा आरोप पूनावाला यांनी केला. मुडा घोटाळा हा ५ हजार कोटींचा घोटाळा असून, त्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, मुख्यमंत्र्यांचे मित्र आणि सहकारी यांना महागड्या जमिनींचे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केला.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 'एक्स'वर पोस्ट काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचाराचा वारसा सुरूच आहे. नॅशनल हेराल्डपासून ते मुडा घोटाळ्यापर्यंत कर्नाटक, काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचाराचा इतिहास सुप्रसिद्ध आहे. वेळोवेळी त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी लोकांचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस स्वत:ला दलित आणि अल्पसंख्याक जनतेचा पक्ष म्हणतो. मात्र, त्यांच्याच एका मुख्यमंत्र्यांनी दलित कुटुंबाच्या जमिनी बळकावल्या आहेत. यामुळे काँग्रेसच्या ढोंगीपणाचे आणि कुटुंबकेंद्रित राजकारणाचे हे आणखी एक उदाहरण समोर आले असल्याचा आरोप त्यांनी केला.