Jaisalmer Maratha Empire
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटी (NCERT) च्या नवीन पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राजस्थानमधील जैसलमेरच्या माजी राजघराण्यातील सदस्य असलेल्या चैतन्यराज सिंह यांनी एनसीईआरटीच्या आठवीच्या पुस्तकात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा हिस्सा म्हणून दाखविल्याबद्दल जोरदार आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे लक्ष वेधून घेत यात लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
एनसीईआरटीने अनेक पुस्तके नवीन बदलांसह सादर केली आहेत. ही पुस्तके राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फॉर्म (NCF-SE) अंतर्गत सादर करण्यात आली आहेत. मुख्यतः इयत्ता ७ वी आणि ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे.
या नकाशात कोल्हापूर ते उत्तरेत पेशावर आणि कटकपर्यंत मराठा साम्राज्य दाखवण्यात आले आहे. जैसलमेरमध्येदेखील मराठा साम्राज्य दाखवले गेले आहे. यावर जैसलमेरच्या माजी राजघराण्यातील सदस्य चैतन्यराज सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ८ वीच्या सामाजिकशास्त्र पुस्तकाच्या युनिट ३ च्या ७१ पानांवर दाखवण्यात आलेल्या नकाशातील वर्णन दिशाभूल करणारे, तथ्यहीन आणि गंभीररित्या आक्षेपार्ह स्वरुपाचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चैतन्यराज यांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, 'इयत्ता आठवीच्या एनसीईआरटीच्या सामाजिकशास्त्र पाठ्यपुस्तकातील (युनिट ३, पान क्र. ७१) नकाशात जैसलमेर हे तत्कालीन मराठा साम्राज्याचा हिस्सा असल्याचे दाखवले आहे. हे इतिहासाच्या दृष्टीकोनातून दिशाभूल करणारे, निराधार आणि गंभीररित्या आक्षेपार्ह स्वरुपाचे आहे.' असा दावा त्यांनी केला आहे.
त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, या प्रकारची खात्री नसलेली आणि ऐतिहासिक पुराव्यांविना माहिती केवळ एनसीईआरटीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करत नाही तर आमचा गौरवशाली इतिहास आणि जनभावनांना धक्का पोहोचवणारी आहे. हा विषय केवळ पाठ्यपुस्तकातील त्रुटीच नव्हे, तर आमच्या पूर्वजांचे बलिदान, सार्वभौमत्वाला आणि शौर्याला कलंकित करण्याचा प्रयत्न आहे.
जैसलमेर संस्थानाशी संबंधित जे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत त्यात कुठेही मराठा साम्राज्य, आक्रमण, कर आकारणी अथवा वर्चस्व यांचा उल्लेख आढळून आलेला नाही. उलट, आपल्या राजकीय पुस्तकांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की मराठ्यांनी जैसलमेर संस्थानात कधीही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही.
चूक दुरुस्तीची मागणी
याकडे त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण जैसलमेर परिवाराच्या वतीने, NCERT च्या या चुकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यात त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही बाब केवळ सत्यता पडताळण्याची नव्हे तर आपला ऐतिहासिक गौरव, स्वाभिमान आणि राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सत्यतेशी संबंधित बाब आहे. या विषयावर तत्काळ आणि ठोस कारवाई अपेक्षित असल्याचे चैतन्यराज सिंह यांनी म्हटले आहे.