Iran America war crisis | सामान्य पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही: केंद्र सरकारची माहिती, प्रीमियम पेट्रोल मात्र महाग File Photo
राष्ट्रीय

Iran America war crisis | सामान्य पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही: केंद्र सरकारची माहिती, प्रीमियम पेट्रोल मात्र महाग

एलपीजीवरील पुरवठा करण्याचा दबाव मात्र सरकारवर कायम, गॅसच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी ४,५०० ठिकाणी छापे

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने ऊर्जा पुरवठा, नागरी सुरक्षा आणि साठेबाजीविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, असे सरकारने म्हटले आहे. तथापि, प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. एलपीजी उत्पादनात ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, पुरवठ्यावर दबाव कायम आहे. गॅसच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी ४,५०० छापे टाकण्यात आले असून, लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, पेट्रोलच्या दरात झालेली वाढ केवळ प्रीमियम श्रेणीपुरती मर्यादित असून, त्यात प्रति लिटर २ ते ३ रुपयांची वाढ झाली आहे. रेग्युलर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. या दरवाढीचा सर्वसामान्य जनतेवर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. एकूण विक्रीमध्ये प्रीमियम पेट्रोलचा वाटा केवळ ३-४ टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एलपीजीबाबत त्यांनी सांगितले की, त्याचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, देशांतर्गत ग्राहकांना पुरवठा सुरू आहे आणि कुठेही तुटवडा नाही.

तथापि, परिस्थिती पूर्णपणे सामान्य नाही आणि आयातीवरील अवलंबित्व हे एक मोठे आव्हान आहे, हे त्यांनी मान्य केले. भारत ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण नाही आणि त्यामुळे प्रत्येक शक्य स्रोताकडून एलपीजी आणि एलएनजीची खरेदी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. पुरवठा सुनिश्चित करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. इराणकडून तेल खरेदी करण्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. सहसचिवांनी पुढे सांगितले की, सरकारने साठेबाजी आणि काळाबाजारावरची कारवाई तीव्र केली आहे.

१९ मार्च रोजी देशभरात ४,५०० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. जवळपास ४,००० गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. राज्यांना कडक देखरेख ठेवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी असेही सांगितले की, घाबरून बुकिंग करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. १३ मार्च रोजी ८९ लाख बुकिंग झाली होती, जी आता कमी होऊन सुमारे ५५ लाखांवर आली आहे. ऑनलाइन बुकिंगचा वाटा ९३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सरकारने जनतेला संयम बाळगण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

दुसरीकडे, एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी पीएनजीचा वेगाने विस्तार केला जात आहे. अलीकडेच, १३,७०० नवीन पीएनजी जोडण्या देण्यात आल्या आहेत. ७,३०० ग्राहकांनी एलपीजीवरून पीएनजीकडे स्विच केले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रुग्णालये यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जात आहे.

३ लाख भारतीय मायदेशी परतले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियातून जवळपास ३ लाख भारतीय परतले आहेत. रियाधमध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. एकूण सहा भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे.

२२ भारतीय जहाजे सुरक्षित

नौवहन मंत्रालयाने सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला असलेली २२ भारतीय जहाजे सुरक्षित आहेत. बंदरांवर कोणतीही गर्दी नाही. गेल्या २४ तासांत पंचवीस भारतीय खलाशी मायदेशी परतले आहेत.

पर्यायी इंधनांवर भर

सरकारने पर्यायी इंधनांवरही अधिक भर दिला आहे. राज्यांना केरोसीन आणि कोळशाचा अतिरिक्त पुरवठा केला जात आहे. त्यांना पीएनजी (PNG) आणि विद्युत पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT