Indore Smart City Road Collapse Video Viral: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून बांधलेला रस्ता अचानक खचल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता अवघ्या तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. नव्याने टाकण्यात आलेल्या 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनची चाचणी सुरू असताना ही घटना घडली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याचा काही भाग अचानक फुटताना दिसत आहे. त्यानंतर रस्त्याच्या भेगांमधून मोठ्या दाबाने पाणी बाहेर येऊ लागले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक आणि नागरिक घाबरुन जागीच थांबले.
पाण्याच्या पाइपलाइनची केवळ चाचणी सुरू असताना रस्ता खचल्याने आता बांधकामाच्या दर्जावर आणि तांत्रिक कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर साध्या प्रेशर टेस्टमध्ये रस्त्याचे नुकसान होत असेल, तर पावसाळ्यात, सततच्या वाहतुकीमुळे आणि भविष्यातील इतर कामांमुळे हा रस्ता किती सुरक्षित राहील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंदूर महापालिकेचे सदस्य आणि माहिती समितीचे प्रमुख राजेंद्र राठोड यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या अनेक कामांच्या गुणवत्तेबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले होते.
राजेंद्र राठोड यांनी आरोप केला की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जवळपास 1 हजार कोटी रुपयांची विविध कामे करण्यात आली असून, त्यातील काही कामांच्या दर्जाबाबत तक्रारी होत्या. त्यांनी यापूर्वीही रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत तत्कालीन महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यावेळी केवळ नोटिसा देण्यापलीकडे ठोस कारवाई झाली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
हा रस्ता काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आला असला तरी त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागल्याचेही राठोड यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राजेंद्र राठोड यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्याचे शहरी विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांना पत्र लिहिले आहे.
सध्या महापालिका आणि संबंधित बांधकाम संस्थेसमोर खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे आव्हान आहे. मात्र, केवळ दुरुस्ती करून प्रश्न सुटणार नाही. रस्ता नेमका कशामुळे खचला? बांधकामात काही त्रुटी होत्या का? की पाइपलाइनच्या कामामुळे रस्त्याच्या आतील भागाला नुकसान झाले? याची तांत्रिक चौकशी झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
40 कोटी रुपये खर्च करून बांधलेला रस्ता केवळ पाइपलाइनच्या चाचणीदरम्यान खचल्याने आता स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.