नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र आयोगाचा अहवाल भारताने नाकारला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, हा अहवाल पूर्णपणे पक्षपाती आणि राजकीय अजेंड्याने प्रेरित आहे. या आयोगाने भारताविरुद्ध खोट्या तथ्यांवर अहवाल देण्याऐवजी अमेरिकेतील मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. रणधीर जयस्वाल म्हणाले की, अहवाल देणारी संस्था पक्षपाती आहे. भारताविरुद्ध चुकीची माहिती पसरवणे हा या अहवालाचा हेतू असल्याचे ते म्हणाले. हा अहवाल फेटाळून लावत त्यांनी संस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयोगाला सल्ला देताना ते म्हणाले की, भारताच्या कारभारात ढवळाढवळ करण्याऐवजी तुमच्या देशातील मानवी हक्कांशी संबंधित समस्या सोडवा.
अहवालात भारतात धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय धार्मिक नेत्यांना भारतात मनमानी पद्धतीने अटक केली जाते. त्यांच्या घरे आणि धार्मिक प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले जाते. मुस्लिम, वक्फ दुरुस्ती विधेयक, गोहत्या विरोधी कायदा यांचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. हा अहवाल दरवर्षी जगभरातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीचे मूल्यांकन करतो. यूएससीआयआरएफने वारंवार भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर चिंता व्यक्त केली आहे.