Operation Sindoor Balochistan Conflict |
नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर ’ने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारताने दहशतवादाला आश्रय देणारा पाकचा चेहरा जगापुढे आणला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना पाकला अंतर्गत बलूच लिबरेशन आर्मीनेही दणका दिला आहे. पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचा प्रदेश म्हणून बलुचिस्तानकडे पाहिले जाते. पाकच्या दृष्टीने या प्रदेशाचे आथिंक, सामाजिक, सामरिक महत्त्व वेगळे आहे.
बलूच लिबरेशन आर्मी स्वतंत्र बलुचिस्तानसाठी संघर्ष करत आहे. बलूच आर्मीने पाकिस्तानच्या सैनिकांवर हल्ला करून आपली ताकद दाखवून दिली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना बलुचिस्तान स्वतंत्र होईल, अशी चर्चा आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, मदत करावी, अशी बलूच आर्मीची अपेक्षा आहे. भविष्यात काही होईल, हे जरी अजून स्पष्ट झाले नसले तरी जर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा स्वतंत्र झाला काय होईल याविषयी कोणते परिणाम होतील, यावर टाकलेला द़ृष्टिक्षेप.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत.
जर बलुचिस्तान वेगळा झाला, तर पाकिस्तानचा भूभाग सुमारे 40 टक्केने कमी होईल.
पाकिस्तानची अरब समुद्रालगतची मोठी सागरी सीमा (ग्वादर बंदरासह) गमवावी लागेल.
चीन-पाकिस्तान कॉरिडॉर प्रकल्पालाही फटका.
बलुचिस्तानमध्ये प्रचंड नैसर्गिक संसाधने (गॅस, कोळसा, तांबे, सोने) आहेत. ती गमवावी लागल्यास पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल.
बलुचिस्तानमधून चीनने बांधलेले ग्वादर बंदर पाकिस्तानच्या संरक्षण दृष्टीने महत्त्वाचे आहे. ते गमावले जाईल.
भारतासह इतर देशांसाठी बलुचिस्तानचा उपयोग रणनीतिक पायाभूत केंद्र म्हणून होऊ शकतो.
पाकिस्तानातील इतर अल्पसंख्याक गटही (सिंधी, पश्तून) स्वतंत्रतेच्या मागण्या उभ्या करू शकतात.